Friday, 14 June 2019

निसर्गाची संगत - नोकरीतील गेली २० ते २५ वर्षे !

निसर्गाची संगत - नोकरीतील गेली २० ते २५ वर्षे !
रेल्वेत नोकरीला लागलो त्याला आता तीस वर्षे होतील आता काही महिन्यात ........
१९९३ ला गार्ड मध्ये रुजू झालो, काही महिने माल गाडी वर काम केले तर काही महिने माल गाडीच्या वाहतूक संबंधित ऑफिस मध्ये काम केले तर मग प्रवासी गाड्या वर काम सुरु केले आणि थोडे फार ऑफिस मध्ये तसेच संबंधी कर्मचारी समित्यांमध्ये काम केले पण .............
जवळ जवळ गेल्या ३० वर्षातील नोकरी पैकी २२-२३ वर्षे प्रत्यक्ष निसर्गाची संगत लाभली
पुढे अनेक वर्षे काम करत असताना आणि सेवा निवृत्ती नंतर देखील निसर्गाची संगत लाभावी हीच जगनियंत्या कडे प्रार्थना !
काल परवा अमावास्येचा अंधाऱ्या रात्रीपण आणि दिवसा परत येताना निसर्गाच्या ऋतू बदलाची चाहूल जाणवताना जो बदल अनुभवता येतो तो केवळ शब्दात मांडणेच कठीण !
कोकण रेल्वेच्या दिशेने काम करताना काँक्रीट जंगल हे पनवेल - रोह्याच्या पलीकडे संपत जाते आणि मग नद्या, टेकड्या. डोंगर, शेते तसेच पावसाळ्यातील धबधबे तसेच झाडे पाने त्यांचे रंग आणि सळसळ जाणवून देत असतो बदल !
मे महिन्यात कोकण रेल्वेच्या दिशेने प्रवासाला जाताना लक्षावधी पिवळ्या, तांबड्या रंगाच्या दिसणाऱ्या लक्षावधी रंग छटा आता अजून पावसाची सुरवात होत असताना लगेच हिरव्या - पोपटी रंगात कश्या बदलतात हे बघणे खूपच आल्हाददायक असते त्या साठी खरंतर रात्रीची गाडी नको, दिवसाची आणि ती पण थांबत थांबत जाणारी व वेळ हवी रिमझिम पावसाची !
लोणावळ्यावरून मुंबई कडे येताना अंधाऱ्या रात्री, खोपोली आणि परिसराचे दिवे मंकीहिल वरून पहाताना उन्हाळ्याच्या रात्री जे थंड हवे बरोबर शेकडो - हजारो खडे हिरे बघितल्याचे सुख लाभते ते अवर्णीय ! गाडी लवकर मुंबईला पोहोचावी आणि ड्युटी संपावी असे क्षणभर वाटत नाही.
कशासाठी पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटा साठी म्हणत ब्रिटिश जमान्यापासून सरकारी दरबारी, हायकोर्टात पक्षकार, वकील, शेअर मार्केट, बँका मध्ये येणारे पुण्याहून सिंहगड, दख्खनची राणी तसेच प्रगती मधून पनवेल मार्गे पण येणारे निसर्ग अनुभवत असतात तर मुंबई हुन पुण्यात आयटी उद्योग बहरल्या पासून इंद्रायणी, डेक्कन, इंटरसिटी तसेच कोयना देखील ओथंबून वाहत असतात असे म्हणतात गर्दी मुळे रेल्वे प्रवासात मसाज हि होतो पण गेले काही वर्षे रस्ता वाहतुकीपेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त असल्यामुळे प्रवासी गाड्या भरभरून जात आणि येत असतात. असो
पावसाळ्याच्या मध्यावर मंकी हिल आसपास पुण्याच्या दिशेला जाताना "उल्हास प्रपात" पाहणे म्हणजे मनसोक्त आनंद लुटणे. पावसाळी, तरुणाई बुशी डॅम, पवना डॅम, पळसदरी डॅम तसेच माथेरान कडे जाताना त्यांच्या उत्साह बघणे म्हणजे न कळत आपल्या तरुणपणाची पाने परत कोवळी हिरवी पोपटी करून पाहणे.
पावसाळ्याच्या शेवटी पितृपंढरवाड्याचा आसपास आणि नवरात्राच्या आधी, अगदी कास पठार फुलण्याच्या वेळी, विशेषतः मुंबई पुणे रेल्वेमार्गावर शेलारवाडी - बेगडेवाडी परिसरात सुंदर फुले फुलतात, थोडी जंगली आणि सुवासाची नसतात म्हणून डोळ्याला रोज त्या दिवसात प्रवास करताना मन प्रसन्न करतात. फ्लोरा लाईन्स !!
गीतांजली, तपोवन झालेच तर काशी आणि पुष्पक या गाड्यानी थळ घाटातून जाताना डावी कडे विस्तीर्ण डोंगर रांगा आणि घळी तर उजवी कडे रिसॉर्टच्या वरती डोंगर रांगावर लक्ष ठेवणारी घाटण देवी परिसर ! पण मन प्रसन्न करतातच !
पान मसाला बांधण्यासाठी, पशु ना खाद्य म्हणून आसनगाव - कसारा भागातून रोज पान तोड, झुडपे तोड होतच असते, गरिबांचे पोट भरते, शहरामधल्यांचे लाड होतात आणि निसर्गाची लूट होते. असो
अरे लिहीत बसलो पण पाऊस लांबला आणि चक्क आमच्या भागात खूप बागा आणि विस्तीर्ण मैदाने असताना देखील एक दोन कूप नलिका विहिरी आटल्याची माहिती मिळाली.
एकी कडे ग्रामीण भागात वॉटर कप स्पर्धा चालू झालेत आणि शहरे, रस्ता, बिल्डिंगस, गटारे फूटपाथस सगळे काही डांबरीकरण, काँक्रीटीकरण म्हणजे निसर्गाशी सतत प्रतारणा !
पंचवीस वर्षांपूर्वी पाच सागाच्या झाडात गुंतवणूक केली होती ................
ती जगली असती ना ! पंचवीस वर्षे मगच कापली गेली असती
पण ती गुंतवणूक हि गुंतावणूक झाली आणि हाती आहे कागदावर लॅमिनेटेड केलेले प्रमाणपत्र !
पण झाडे जगवलीच गेली नाही पंचवीस वर्षे !
ह्यात क्रूरता काय तर, माझे आणि इतरांचे पैसे बुडले म्हणून नाही तर निसर्गाच्या नावाने स्वतःचे चांग भले करून घेणाऱ्या माणूस प्राण्याच्या आप्पलपोटी पणाची !
पुन्हा एकदा,
पुढे अनेक वर्षे काम करत असताना आणि सेवा निवृत्ती नंतर देखील निसर्गाची संगत लाभावी हीच जगनियंत्या कडे प्रार्थना !
१५ जून २०१८
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)


Displayed on 15th June'18 at FB

No comments:

Post a Comment