रानपरी
परवा माझी मेल एक्सप्रेस गाडी इगतपुरी हून सकाळी सकाळी निघाली आणि खर्डी स्टेशनवर गाडी जात असताना काही कष्टकरी बायका घोळका करून बसल्या होत्या अन त्यात परत एकदा रानपरी दिसली.
साधारणतः आठ ते दहा वर्षांपूर्वी उपनगरीय गाड्यावर काम करत असताना ह्या रानपरीची ओळख अथवा माहिती झाली होती. लोकल गाडी वर काम करताना पुढे जाणाऱ्या माल गाडीचे इंजिन नादुरुस्त झाले जरा वेळ झाला होता खूप सारे नोकरदार, व्यापार उदीम वाले जवळ पास हायवे गाठून आपापल्या उद्योगाला निघाले पण भल्या पहाटे पहिल्या कसारा ते मुंबई लोकल ने गेलेल्या कष्टकरी बायका दादर फुल मार्केट मध्ये पळसाच्या पानांचे गठ्ठे पोचते करून परत खर्डी परिसरात परत चालल्या होत्या.
गाडी खूपच वेळ थांबली अन त्या काळात छान आदिवासी ग्रामीण गाणी ऐकायला येत होती, अगदी मराठी चित्रपट 'जैत रे जैत' ची आठवण झाली. गाणे रानपरी म्हणत होती अन बाकी बायकांनी ठेका धरला होता.
रानपरी ................ महादू अन पारो कातकरी जोडप्याची पोर ! दोन भावांच्या नंतर झालेली उगीच शाळेत जाऊन लिहिता वाचता येऊन पुढे कुठे शिक्षणाचा ध्यास घेणार तितक्यात ह्या रानपरीचे लगीन ठरले...
पाड्यावरील राम्या कातकरी कुटुंबाने हिला सून करून घ्यायची मागणी घातली होती कारण पण तसेच होते. नाकी डोळी नीटस एकसमान छान चमक असलेल्याला सावळा वर्ण अन वेळ पडली तर मुलांसारखी झाडावर चढ तर कुठे मोठ्या भावाची सायकल चालव हे स्वच्छंद पणे खेळणारी.
रानफुलांच्या माळा डोई वर कानाच्या वर लेवून आनंदी राहणारी पोर अन पारो सांगायची कि चुली वर भाकरी थापायला पण परी चा हात मागे हटत नाही.
राम्या कातकरी कुटुंबाने बरोबरी परी ला हेरले, महादू अन पारो कडे रान परी कडे आपल्या राजू साठी मागणी घातली, राजू ! राम्या कातकऱ्याचा धाकटा पोर थोडासा शांत राहाणारा, तीन पोरी नंतर काही वर्षाने राजू झाला आणि राजू ची आय म्हणजे राम्याची बायको आजारी पडली होती बाळंतपणात पण पाड्यावर येणाऱ्या डागदर अन ग्रामसेवकाने, राम्याचा धावपळीत साथ दिली अन राजू च्या आय ला ग्रामीण रुग्णालयात भरती केली. राजू ला पाड्यावरील बायकांनी सांभाळले अगदी पारो नी पण काही काळ बघितले होते. भाताची पेज अन इतर त्याला दिले जात होते पण त्याच्या आयच्या अंगावरचे दूध पोराला मिळाले नाही बराच काळ अन मग तो थोडा मोठा झाला, आय घरी होऊन परत सर्व कर्ती सवरती झाली पण राजू अंगावरचे घेईनासा झाला.
राजू मग थोडा इतर पाड्यावरील मुलांसारखा खेळ व इतर गोष्टी मध्ये कमी रमत होता. बांबूचा पावा अन ढोलकी ह्या दोन्हीचा छंद राजू ला लागला. पाड्यातील भजने अन इतर कार्यक्रमात राजुचा पावा घुमत होता अन ढोलकी वर थाप पडत होती.
राम्या थोडा वयाने अन पाड्यावरील मानाने महादू पेक्षा मोठा होता. राम्याचा उंबरठा रानपरी ला सून करून घेणार म्हणून महादू अन पारो आनंदली होती, राजू थोडा शांत असला तरी त्याचा पावा अन ढोलकी रानपरीला पण आवडायची.
काही काळात रानपरीचे अन राजू चे लगीन झालं, डोरले बांधले, चांगलं जड मणी होता त्यात महादू अन पारोच्या कमाईचा ! पोरीचा हात राजुच्या हाती देऊन, राम्याचा अन महादूचा उंबरठा खुशीत होता.
रानपरी अन राजू च्या लगीन झाल्यावर नवरा बायको संबंधात राजू कमी पडू लागला. रानपरी बेभान व्हायची अन राजू चा पावा अन ढोलकी सारखा सूर अन ताल इथे जमत नव्हता आधी धाप लागायची मग ग्रामीण रुग्णालयात अन समाजसेवी डॉक्टरांच्या कॅम्प मध्ये राजू ला दाखवल्या वर हे निश्चित झाले कि राजू ची इच्छा आहे पण उर्मी कमी पडत होती. शरीर साथ देत नव्हते.
डागदर नंतर वैदूला पण बोलावले त्याने रानऔषधी दिली पण राजू ला ती झेपेनासे झाली. खूप उष्ण पडली मग परत सरकारी दवाखाना ! तिथल्या डॉक्टर लोकांचे खडे बोल ! राम्या, राम्याची बाय, महादू अन पारो सर्व उदास झाले.
एक दिवस तालुक्याच्या दवाखान्यातून एस टी तुन येताना गर्दीत, राम्या अन रानपरी असताना राजू अचानक कोसळला, सगळे संपले होते राम्या कातकरी खचून गेला राम्याची आय धाय मोकलून रडत होती. महादू अन पारो खिन्न झाले होते. रानपरी राजुच्या त्या थंड पडलेल्या शरीराकडे खिन्न होऊन शून्यात बघत होती.अंत्यसंस्कार झाले अन मणी तुटला, डोरले खाली पडले अन रानपरीची मान ओकी बोकी दिसायला लागली.पाड्यावर तसेच आजूबाजूच्या वस्तीवर चर्चा रंगू लागल्या, राजू लहानपणी अंगावर कमी प्यायला होता म्हणून तर.... कोणी म्हणे रानपरी भारी पडली त्याला .................
राम्या, महादू दोन्ही उंबरठे खिन्न होते, दोघांना जबाबदार मुले होती ती पावसाळ्यात डोंगर उताराच्या भागात भात शेती करणे, पळस, फाटा आणणे कधी गावठी मधाला अथवा वटवाघळाच्या तेलाला मागणी आली तर ते काढून आणणे तर कधी जवळच्या धाब्यावर, कंत्राटावर मोल मजुरी करू लागली.
रानपरी खिन्न बसून होती काही काळ मग तिच्या परत लग्नाचा विचार जरी राम्या अन महादुने केला तरी जणू ती आता समाजात शापित अप्सरा झाली होती ऐन विशीत !
हळू हळू रानपरीने पण विषय काढला अन मग पाड्यावरून पळस, फाटे, रान भाजी घेऊन जाण्याऱ्या बायका बरोबर ती पण कधी पहाटेच्या टिटवाळा प्लॅटफॉर्म वर भाजीच्या तर कधी दिवा - मुंब्र्याच्या फाटे बाजारात जाऊ लागली. कधी गुडीपाडवा दसरा दिवाळी साठी कडुनिंब तसेच तोरणाचा झाड पाला व पळस घेऊन जाऊन लागली. आज जवळ जवळ आठ ते दहा वर्षांनी एका धावत्या गाडीतून दिसली होती पण तिशीतही ती जणू विशीतली दिसत होती अन थोडे स्वकमाई चे तेजहि तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.खरोखर नियती क्रूर असते कधी कधी मग रानपरीची होते शापित अप्सरा !
रानपरीच्या आयुष्यात पण रंगाची उधळण होऊ दे ती पण परत ढोलकी अन पाव्याच्या तालावर नाचू बागडू दे हीच होळी च्या पूर्व संध्ये वर मनःपूर्वक शुभेच्छा !
तिच्या अन तिची हि गोष्ट वाचणाऱ्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचे रंग भरणारी रंगपंचमी यावी हीच नियती कडे प्रार्थना !
© रविंद्र गांगल(पोस्ट चा बहुतेक भाग मिळालेल्या माहिती वर तसेच बराचसा काल्पनिक आहे, एखाद्या व्यक्ती बद्दल समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप!) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Displayed at FB on 20th March 2019
No comments:
Post a Comment