Friday, 4 October 2019

"रवि"

"रवि"


*दूर नहीं हुं, दूर नहीं हुं 

फिर आऊँगा कोहरे मे रहुंगा

थंड लगी तो याद करना

बादलो को दूर करूंगा 

फिर आऊंगा...लाऊंगा 

कभी तेज कभी प्यार भरा जीवन


फिर आऊँगा... लाऊंगा 

भाल पे गाल पे

फिर सुबह कि लाली लाउंगा 

दूर नही हुं...दूर नहीं हुं

फिर आउंगा*

दूर नहीं हुं, दूर नहीं हुं


(जाडे का या  थंड का मौसम आया ही समझो  !ओर फिर सुरज याने "रवि" क्या व्यक्त होता है पढिये !बस पंक्तिया है, गद्य है या पद्य ? उसे आप समझ लिजिए !)

© रविंद्र गांगल( Displayed at FB timeline 4th October 2019)


Thursday, 1 August 2019

दखल

दखल

साधारणतः ५५ वर्षे वयाच्या वरील तीन लाख कर्मचाऱ्यांना निवृत्ती दिली जाणार अश्या प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमात झळकू लागल्या अन एक चर्चा सुरु झाली.
मुळात नोकरीची तीस वर्षे आणि / अथवा पंच्चावन वर्षे पूर्ण झाली कि सर्व्हिस रिव्हयु घ्यावा हि चौथ्या वेतन आयोगानंतरच्या काळापासून आलेली तरतूद आहे असे म्हंटले जाते त्याची काही ठिकाणी अंमलबजावणी पण झाली जरुरी पुरती अर्थात गवगवा आत्ता सुरु झाला कारण वाढत्या प्रौद्योगिकीच्या वापरा मुळे काही विभागांच्या नैमित्तिक कामात पूर्ण बदल होत गेला अन ह्या पुढेही जात राहील.


उदा. रिझर्वेशन सेंटर पहिले एक दोन मजली तीस तीस काउंटरस चे ठराविक ठिकाणी होते मग सर्व दूर झाले अन आत्ता खूप सारी तिकिटे मोबाईल अँप वर तसेच वेबसाईट च्या माध्यमातून विक्रीस येऊ लागली मग रिझर्वेशन सेंटर्स मधील स्टाफ अन त्या साठीच्या इमारती ह्याचा उपयोगाबाबत मंथन सुरु झाले हेच फक्त रेल्वेतच घडत आहे असे नाही तर विमा, बँका रोड ट्रान्सपोर्ट शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी कंपन्या इस्पितळे विद्यापीठे अश्या विविध संस्था यांना प्रौद्योगिकी च्या वापर बदला मुळे होणाऱ्या परिमाणाना सामोरे जावे लागत आहे आणि पुढील काळातहि जावे लागेल.

१९९० च्या दशका नंतर नवीन आर्थिक सुधारणा, गॅट डंकेल प्रस्ताव अन प्रौद्योगिकी हे सगळे हातात हात घालून आले, व्हाईट कॉलर ब्ल्यू कॉलर एवढेच नव्हे तर पिंक कॉलर म्हणजे अधिकारी वर्ग ह्याच्या सगळ्यावर एक कॉस्ट कटिंग चे भूत शिरले त्यातून कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, नॉट ऑन कंपनी पे रोल, हायर अँड फायर हे सर्व जोर धरू लागले.

ब्रिटन मधील रेल्वेचे खाजगीकरण झाले अन पुनः सरकारीकरण झाले अर्थात ह्याचा शोध अन बोध घेतला गेला नाही तो घ्यायला हवा.

कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स च्या अथवा ह्या १९९० च्या नंतरच्या ह्या सर्व अतिवापराचे परिणाम आता इकॉनॉमी वर स्पष्ट दिसू लागले आहेत असे मानावे लागेल कारण टेलिकॉम, विमान कंपन्या बँका ह्या धडाधड बंद पडू लागल्या कारण सॅलरी कॉस्ट कटिंग मुळे निदान आस्थापनांचे तीस ते पन्नास हजार रुपये वाचू लागले पण तेवढ्याच रुपयांनी प्रत्येक कर्मचारी मागे म्हणजे देशभरातील विविध संस्था मधील समजा काही लक्ष कर्मचारी ह्यांच्या मागे काही कोटी अथवा अब्ज रुपये वाचले असले तर त्याचा दुसरा अर्थ तेवढे पैसे हे मार्केट इकॉनॉमी मधून गायब झाले. म्हणजेच मंदीने पकड घ्यायला सुरवात झाली.
नवीन आर्थिक सुधारणा, गॅट डंकेल प्रस्ताव अन प्रौद्योगिकी चा १९९०-२००० च्या दशकात खूप बोल बाला होता पण चीन ने औद्योगिक आणि वैश्विकरणाची दारे उघडल्या नंतर २००० -२०१० च्या दशकात अमेरिकन कंपन्या अन तिथली मार्केट इकॉनॉमी गोते खाऊ लागली मग कुठे त्यांना जाग येऊ लागलेय कि ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन हे घातक आहे का ?

अमेरिकेच्या खाजगी बँका आणि मालमत्त्ता कर्ज कंपन्यांना वाचवण्यासाठी तेथील फेडरल सरकार अन केंद्रीय अर्थ संस्थेला साह्य करावेच लागले अन हे जगाने पहिले कि सरकार कर्जबाजारी अन सरकारी कर्मचाऱ्यांना ले ऑफ अथवा टाळेबंदी पण कंपन्या वाचवण्यासाठी तेथील सरकारची धडपड !

आपल्या कडे जागतिक बदलाची स्थिती अथवा तेथील दोन्ही दृष्टीकोनात होणार बदल सामावून घेण्याची जरी वृत्ती आणि दृष्टी असली तरी लोकसंख्येचा अन बेकारांची संख्या हे सॅलरी कॉस्ट कटिंग च्या भुताला अधिक गहिरे करतात.

अर्थ सुधारणा जागतिक करार अथवा त्याचा अंमलबजावणी मुळे कर्मचारी कामगार हयांच्ये संख्येची कपात अन नवीन कॉन्ट्रॅक्ट कामगारांना पूर्वीच्या तुलनेत दिला जाणारा तुटपुंजा पगार ह्या मुळे सर्वच क्षेत्रे ढवळून निघत आहेत.

मोठ्या शहरातून मोठ्या प्रमाणावर स्त्री पुरुष दोघांना जीवन खर्चाचे तारू साधण्यासाठी नोकरी करावी लागत आहे त्यात जर ती तुटपुंजी पगाराची असेल तर मग लग्ने उशिरा अथवा लिविंग रिलेशनशिप, गे अथवा लेझबीन साथीदार तसेच सेक्स वर्कर आधी सामाजिक समस्या अधिक जोमाने जोर धरू लागल्या आहेत.

एवढेच नाही समाजाच्या सर्व थरातील कामुकता, लैंगिक गुन्हे, मोबाईल गेम्स आत्महत्या आदी पण वाढत्या प्रौद्योगिकीच्या गैर वापरा मुळे वाढत आहे असे म्हटले जाते.
वर्किंग क्लास चे पगार अथवा खात्रीच्या नोकऱ्या कमी झाल्याच्या फटका आता गृहनिर्माण क्षेत्रात बसत आहे हजारो फ्लॅट तुलनेने स्वस्त भागात रिकामे आहे पण झोपडपट्टी कमी झाल्याचे ऐकायला येत नाही

सेवा, पर्यटन, हॉटेलस, ऑटोमोबाइल्स ह्या सर्वा मधील डिमांड हा पूर्ण वेगाने संकुचित होत आहे अन पुढे आणखीन होईल अशी चिन्हे आहेत.
नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, गोल्ड कंपन्या ह्यातील जीवघेणी स्पर्धा बदल अन कर्जबाजारी, पायाभूत कर्ज साह्याय्य आणि त्यातील कमी अथवा ऋण परतावा ह्या सर्वाचा परिपाक म्हणून एका शीर्षस्थ संस्थेतील कर्जाचा आकडा तर कधीच अंदाजे ९०००० हजार कोटींनी पार केला आहे असे म्हणतात.

ह्या सर्वाची दखल केवळ कामगार, नागरिक, कर्मचारी, अधिकारी. समाजकारणी व सुशिक्षित तसेच लोक प्रतिनिधी ह्यांना वेळेत घ्यावी लागेल असे निश्चित वाटत आहे.

© रविंद्र गांगल

( शेवटच्या चाकावरुन -सेवानिवृत्ती समयी अथवा नंतर प्रसिध्द होऊ शकणाऱ्या अथवा ह्या नावच्या ब्लॉग चा एक भाग )(जीवन अनुभवातील आधारीत लेख अथवा पोस्ट,चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Saturday, 13 July 2019

वारी समाधानाची - श्री भानुदास निर्मळ



वारी समाधानाची - श्री भानुदास निर्मळ


मूळचा माळशिरस गावचा पण लहानपण / तरुणपण  वडिलांसोबत पुण्याच्या गरिबावस्तीत राहिलेला,  मुंबईत  काही वर्षापूर्वी सेवा निवृत्त झाला तेव्हा त्याच्या वतीने जेष्ठ सहकारी यांनी त्याचे दोन शब्द व्यक्त केले ते खालील प्रमाणे :

"आयुष्यात आपण आपल्याला सुख समाधान मिळावे यासाठी खूप धडपड करतो पण इतरांच्या व्यापक हिताचे अन् सुखाचे  लक्षात घेऊनच  स्वतःच्या सुख समाधानाला आवर घालण्यासाठी प्रसंगी कटू वाटणारा निर्णय घ्या"

भानुदास निर्मळ ! एक चतुर्थ श्रेणीतील कामगार सहकारी पण त्याच्या सेवा निवृत्तीला निदान दोनशेएक  माणूस जमला, एका ऑफिस बिल्डिंग च्या गच्चीवर छोटेखानी कार्यक्रम झाला. कागदी प्लेट मध्ये बटाटा चिवडा / साबुदाणा चिवडा अन बटाटा वेफर्स तसेच गोड म्हणून साजूक तुपातील दोन दोन जिलेबी व नंतर फक्कड मसाला दूध !

भानुदास एकदम बुवा माणूस !
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ  नामदेव तुकाराम
जय जय रामकृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही विष्णू दास

हा मंत्र म्हणत तो खात्यात काम करत होता अन सोबत जे चित्र दाखवले आहे त्या सारखा टिळा तो नेहमी आपल्या कपाळी लावत असे.
भानुदास नेहमी वारीला न चुकता जाई अगदी सर्व्हिस मध्ये जर रजेच्या बद्दल गोंधळ गडबड झाली तर मोठ्यात मोठ्या साहेबा कडे जाऊन वारीच्या काळात पूर्ण आळंदीतून पालखी निघून पंढरपुरास जाऊन परत आळंदीत येई पर्यंत भानुदासांची रजा असायची.
पूर्ण वर्ष एखादी पण दांडी नाही अगदी जर सागेसोयऱ्या मध्ये कार्यक्रम असेल तर त्या पुरती रजा फक्त ते सुद्धा दरवर्षी नाही !

बाहेर खात्याच्या गणवेश अन आत लाल कॉटन बंडी ! आधी भेट झाली तर मला वाटले कि डोक्याने गरम असेल कारण लाल रंग पसंत आहे म्हणून पण म्हणायचे टक्कुरं फिरले तर गरम नाहीतर पार थंड !

 फक्त माऊलीचा जयघोष करायचा मग सगळी कामे होतात विनासायास !

मी खात्यात नवीन लागलो तेव्हा  तर इतर सगळ्यांना चहा नाश्ता देताना माझ्या टेबलावर जवळ आले अन म्हणाले अगदी काश्याच्या लाल्या टाईप दिसता ( तरुणपणी ढप नव्हतो ) मग कडक चहा तुम्हाला माझ्या तर्फे ! मी म्हंटले असे नाही तुम्ही कशाला उगीच खर्चात पडता तर म्हणाले वयाने मोठा असलो तरी तुम्ही नवीन छोटे साहेब आहात.

रोजच्या रोज चंदनगोळीचा आकडा त्यात शेंदूर पद्धतीचे लेपन अन वर काळ्या बुक्क्याचा  टिळा !

मुखी माऊलीचा जयघोष ! ते  ते ऑफिसात आले कि ........"अवघे गर्जे पंढरपूर......" ह्या पदाची आठवण व्हायची.

एक वर्षे मुंबईत हि गडगडाट सह उन्हाळाच्या सरते शेवटी पण पावसाळ्या आधी पाऊस धरला !

मी कार्यालयाच्या जवळ राहायचो आणि लग्न झाले नव्हते मग सकाळी कार्यालयात  पोहोचलो तर चावीवाल्याने ऑफिस उघडून दिले व मी थोडी टेबल खुर्ची धड करणार तेवढ्यात मागून आव्वाज आला नेहमीचा !

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ  नामदेव तुकाराम
जय जय रामकृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही विष्णू दास

त्या दिवशी कार्यालयांत उपस्थिती तुरळक होती, डिव्हिजन ऑफिस मधून फोन आला किती जण आले आम्ही नावे घेतली अन मग समोरून हाच जयघोष आला तर ते साहेब म्हणाले कि आलेच असतील श्री निर्मळ ! मी अचंब्याने हो म्हंटले तर समोरून फोन वरून साहेब म्हणाले तरुणपणीचा "भान्या" पार बदलून आता भानुदास बुवा झाला !
 फोन ठेवला गेला !

मी माउलीला म्हणजे भानुदास बुवांना हाक मारतोय तर ते तर चहा आणायला गेले होते ! यथावकाश चहा आला मग मी बुवांना फोन वरील संवाद सांगितला  तर ते म्हणाले 

"पुण्याचे दोन जण साहेब म्हणून डिव्हीजनल ऑफिस ला आहेत, ते मला अन माझ्या बा ला पहिल्या पासून ओळखतात"

त्या दिवशी मोकळा वेळ होता मग बोलणे झाले

भानुदास चे वडील पुणे मालधक्क्यावर हमाली करायचे अन त्यांचीच आठवण म्हणून भानुदास युनिफॉर्मच्या आत लाल बंडी वापरायचे. वडिलांनी खस्ता खाल्या पण दोन मुले आणि दोन मुली ह्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, मुली शिकल्या दहावी पर्यंत पण मुले शामराव अन भानुदास शिकेना कारण त्यांना एक मित्र होता गोप्या मग तिघे मिळून हुल्लड बाजी करायचे त्यात शामराव रस्ते अपघातात स्वर्गवासी झाला वडिलांनी हाय खाल्ली भानुदास ला पुण्याचे माने साहेब व जोशी साहेब ह्यांच्या समोर उभा केला मग त्या दोघांनी भानुदास ला रोजंदारी कार्डावर भरती केला यथावकाश भान्या झाले  भानुदास झाले


भानुदास, शामराव  अन गोप्या तिघे  दोस्त पण तरुणपणीच्या मौज मजा दंगा मस्तीत शाम्याचा बळी गेला  अन भानुदास रोजंदारीच्या कार्डावर खात्यात भरती झाले अन गोप्या रिक्षा लाईन ला गेला.

नोकरीत सुरवातीला भानुदासाचे मन लागेना पण बा ची इच्छा म्हणून करणाऱ्या नोकरीत रोजंदारी तर रोजंदारी पण दांडी ते मारत नव्हते, परमार्थाला अथवा वारकरी पण झाले नव्हते.  खात्यात वजन टाकून दोन्ही साहेब लोकांनी भानुदासाला पर्मनंट केले, बा ने लग्न लावून दिले, कांचन लक्ष्मी म्हणून आली तेव्हा भानुदासांची मुंबईत बदली झाली.  टिटवाळ्याच्या पुढे खडवलीत एक खोलीची जागा घेऊन त्यांनी आपला संसार सुरु केला, कांचन दहावी झालेली अन भानुदास आठवी नंतर पुस्तक गुल ! पण कांचन वर जीव जडला त्यांचा अन राजा राणीच्या संसारात एक छोटी परी पण आली.

पुण्यात गोप्या रिक्षा लाईन मध्ये असताना आपली मस्ती करत होता, बाई, बाटली अन गुटखा ह्याने वेढलेला अन कधी मधी वर्षा काठी  भानुदासला गाठून उधारी उसनवारी  !
गोप्याच्या व्यसनांनी गोप्याला शिवडीचे टाटा कॅन्सर हॉस्पिटल  दाखवले, मित्रा च्या साठी भानुदास पुण्यास जाऊन गोप्याला घेऊन आले पण औषधोपचाराच्या बरोबर गोप्याने बाटली काही सोडली नाही. शेवटी गोप्याला मित्राच्या हातून अग्नी द्यावा लागला !

पण गोप्याने जाताना मात्र  भानुदासा कडून वचन घेतले कि माऊलीच्या दर्शनाला जाशील अन माझा पण नमस्कार सांगशील !

भान्या, भानुदास, भानुदास निर्मळ ते माउली माउली विठ्ठल विठ्ठल म्हणत येणारे अन आम्ही विष्णुदास म्हणवणारे,  श्री भानुदास निर्मळ कसे झाले ते समजलेच नाही !
रोज सकाळी माऊलीची पूजा अन ज्ञानोबा तुकोबांच्या  तसबिरीला गोपी चंदन टिळा लावून मग स्वतः गोपीचंदनाचा आकडा मध्ये केशरी गंध अन वर बुक्क्याचा ठिपका ! मग दिनचर्या चालू !

त्या दिवसाच्या पाऊस गोंधळ गडबडी मुळे, मला वारी बद्दल सखोल माहिती मिळाली,
वारी, दिंडी, लेझीम, गोफ, चोप, खेळ , उभे रिंगण, गोल रिंगण, अश्वाची दौड, ध्वज अन बरेच काही !

भानुदास बेभान होते अन बाहेर पाऊस हि !

पावसाच्या जोर वाढला तसे भानुदास अजून बेभान होऊन जीव ओतून सांगू लागले अनेक गमती जमती वारीच्या, पुणे, सासवड, वाखरीं, उरळी कांचन, अकलूज, चांदोबाचा लिंब, सदाशिव नगर ते थेट प्रदक्षिणा, भीमा काठ आदी, भानुदास वर्ष दोन काठी  कधी तुकोबांच्या तर कधी ज्ञानोबांच्या पालखी - वारीत जात जोडीदारा सोबत अन एक वर्ष तर कांचन बाई पण तुळशीवृदांवन डोई घेऊन सामील झाल्या जेव्हा मुलें मोठी झाली अन घरी आई आली होती तेव्हा !

भानूदास सांगत होते कि वारीतील आहार, जेवणखाण, उपास पदार्थ, साग भाजी, हुरडा तर कुठे जिलेबी, लाडू!

 सर्व माउली पुरवते आपल्या भक्ता करवी, पैसा घेऊन जावा वारीला तर परत येतो तसाच्या तसा ! वर येते समाधान ! माउली माउली !

गोप्याने जाताना माझ्या आयुष्याचे सोने केले म्हणत त्या दिवशी भानुदास रडले ! 

अश्रू थांबेना !

मी ऑफिसच्या चावीवाल्याला आवाज दिला अन त्याला आम्हा तिघांना चहा आणायला सांगितले !

चहा घेऊन आम्ही निघालो ! त्या दिवसाला बरीच वर्षे लोटली !

आज  श्री भानुदास निर्मळ सेवा निवृत्तीची पार्टी देत होते अन होते समोर त्यांचे मनोगत श्री जोशी साहेबांच्या शब्दात !

"आयुष्यात आपण आपल्याला सुख समाधान मिळावे यासाठी खूप धडपड करतो पण इतरांच्या व्यापक हिताचे अन् सुखाचे  लक्षात घेऊनच  स्वतःच्या सुख समाधानाला आवर घालण्यासाठी प्रसंगी कटू वाटणारा निर्णय घ्या"

रहावले नाही बोललो भानुदासांशी !  म्हणाले साहेब वारीला चला !

शहरातील लोक सकाळी चालतात पण वारीच्या मार्गावर ज्ञानोबा तुकोबा ह्यांचा २५० किमी च्या वारीत चला,

पैठण - सज्जन गड वरून येणाऱ्या पालखीत चला !  अथवा ताकद दाखवू शकत  असाल तर मुक्ताबाई अन गजानन महाराजच्या ४००-४५० किमी च्या पालखीत चला !

रांगोळी पताका चालतील पण फ्लेक्स बाजे नकोत
एकतारी लेझीम बरा!

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी ! तुळशी वृंदावन घेऊन माय भगिनी येतातच
गावो गावी  वडा पिंपळाचे पार संपत चालले ते लावायला रोपे  घेऊन चला
पण पालखीत चला !

आपले स्वतःचे  सुख समाधान सोडा अन वारीत चला बस माउली  उभी  आहे युगे अठ्ठावीस भक्तांच्या सेवेत
बस हीच समाधानाची वारी ! 

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ  नामदेव तुकाराम
जय जय रामकृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही विष्णू दास

© रविंद्र गांगल

( शेवटच्या चाकावरुन -
सेवानिवृत्ती समयी अथवा नंतर प्रसिध्द होऊ शकणाऱ्या अथवा ह्या नावच्या ब्लॉग चा एक भाग )(जीवन अनुभवातील प्रसंगात योग्य वाटेल असा बदल करून आधारीत लेख अथवा पोस्ट,चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)




Monday, 17 June 2019

व्यक्त की अव्यक्त !?

व्यक्त की अव्यक्त !?

दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे,
 पण दोघांची एकमेकाशी भेट नाही !!

पर्णा वरील दव बिंदू सारखे दोघे एकमेकांबरोबर असतात पण........

दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगतात अन् दोघे एकमेकांबरोबर खूप साऱ्या वेळेस एकत्र ही दिसतात पण....

खूप सारे जण प्रेम म्हंटले की त्यांची पदोपदी आठवण काढतात पण..

ते निकट असले अन् एकमेकाच्या प्रेमात असले तरी कधीही ........

मग त्याला काय म्हणावे व्यक्त की अव्यक्त !?

© रविंद्र गांगल

( शेवटच्या चाकावरुन -
सेवानिवृत्ती समयी अथवा नंतर प्रसिध्द होऊ शकणाऱ्या अथवा ह्या नावच्या ब्लॉग चा एक भाग )
चित्र सौजन्य : इंटरनेट
आज पहाटे म्हणजे १८ जुन २०१८ च्या पहाटे साधारण सव्वा तीन ला नासिक च्या क्षितिजावर  झुकणारे चंद्र अन् शुक्राची चांदणी ह्याचे विलोभनीय प्रेम व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात दिसले पण माझ्या कडील कॅमेऱ्यात त्याचे यथा योग्य साठवण होऊ शकली नाही म्हणून इंटरनेट वरील चित्र येथे प्रसिद्ध केले.

© https://shevatachyachakavarun.blogspot.com




https://m.facebook.com/story.php?story_fbid=2522752124422700&id=100000638119960

Friday, 14 June 2019

आम्ही वाघा च्या हद्दीत कि वाघ आमच्या हद्दीत ....................?

आम्ही वाघा च्या हद्दीत कि वाघ आमच्या हद्दीत ....................?


No photo description available.


No photo description available.


माझ्या लहानपणीची म्हणजे १९७५ सालची गोष्ट, आता ठाण्यात नौपाडा पोलीस स्टेशन आहे त्याच्या अलीकडे इसी टीव्ही ची शोरूम होती त्याच्या अलीकडे एक सायकल चे दुकान होते भाड्याने मिळायच्या सायकली, आणि मी ८-९ वर्षाचा, आख्या ठाण्यात टीव्ही चे एकच शोरूम आणि टीव्ही नावाची भानगडच कमी त्या वेळी मग सायकल भाड्याने घ्यायची आणि मस्त चालवायची .

नौपाडा पोलीस स्टेशन - हरिनिवास सर्कल - विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर - फॉरेस्ट रेंजर ऑफिस - तीन हात नाका च्या अलीकडे ऑक्ट्राय जुनी चौकी - मिडल स्कुल शाळा - मल्हार सिनेमा - कलकत्ता पॉवर लाऊंड्री - टेलिफोन एक्सचेंज - परत नौपाडा पोलीस स्टेशन हि हद्द
कधीतरी विष्णू नगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी पण तीन हात नाक्याची हद्द म्हणजे
फॉरेस्ट रेंजर ऑफिस च्या पलीकडे वागळे इस्टेट आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कडे जाण्याची
बंदी होती.

एकदाच गेलो आणि जन्माची अद्दल घडली तापता चमचा हाताला नुसता हातावर टेकवण्याची भीती दाखवली गेली आणि त्या मस्तीतही तो थोडासा हातावर लागला ही............. आणि आता कुठे शरीरावरील ओळख खूण म्हणून सांगता येते कि " बर्न मार्क ऑन राईट हॅन्ड" असो

आई वडिलांनी दंडक घातला होता कि तीन हात नाक्याचे पुढे जायचे नाही कारण चंद्रनगर ला लागून फॉरेस्ट रेंजर ऑफिस होते तेच मुळे.................... बोरिवली नॅशनल पार्क - येऊर जंगल - ओवळा - नागला परिसरातील वाघ हिंस्त्र श्वापदा वर नजर ठेवायला ...................
घाटकोपर च्या पंचमहाल टेकड्या पासून घाट सुरु म्हणून ते घाटकोपर पुढे तीच टेकडी रांग, विक्रोळी हिल साईड इस्टेट, पवई, विहार, चांदिवली, बोरिवली, कांजूर,भांडुप कॉम्प्लेक्स, मुलुंड, येऊर ते थेट ओवळा - नागला पर्यंत हा झाला पूर्वेकडचा भाग त्याच्या पलीकडे पश्चिमे कडे अंधेरी कोळ डोंगरी च्या पुढे अगदी जोगेश्वरी, दिंडोशी थेट दहिसर खाडी पर्यंत वाघांचा प्रदेश .............. आणि हो हा भाग सगळा 

१९५१-५२ पर्यंत ठाणे जिल्ह्याचा भाग होता ............................
पहिले औद्यीगिकीकरण, मग निवासी इमारती आत मेट्रो कारशेड ही मग वाघ काय जंगलात राहतील काय ते येणारच - अंधेरी - पवई - विक्रोळी हिल, बोरिवली, दिंडोशी, पोखरण, उपवन वगैरे भाग सोडून वाघ ( लेपर्ड ) आज भांडुप कॉम्प्लेक्स सोना पूर भागातून बहुतेक ............थेट मुलुंड पूर्वच्या नाने पाडा गावठाण विभागात घुसला ---------------- अरे आख्या देशातून इथे किती जण स्थायिक झाले, होत आहेत आणि होणार आहेत पण त्याचे ठिकाण त्याची शिकार असुरक्षित वास्तव्य झाले तर मग तो येणारच आपल्या भागात!...............................

( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, एखाद्या प्रसंगावर समयोचित माहिती होणे आवश्यक आहे म्हणून हा खटाटोप) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Picture Courtesy: Google map – satellite option

Displayed on 13th Jan'2018 at FB

फ्लोटिंग वोटर्स

" फ्लोटिंग वोटर्स "


अलीकडच्या राज्यस्तरीय / आंतरराष्ट्रीय निवडणूक पहिल्या, ऐकल्या त्याचे सांख्यिकी विश्लेषण बघितले तर मला असे लक्षात आले कि निवडणूक फिरवतात अथवा सत्तेचा सारीपाट बदलतो तो फ्लोटिंग वोटर्स !

बहुतेक राजकीय पक्ष मूलतः एखाद्या सिद्धांत अथवा विचारधारेला धरून असतात अगदी जगाच्या कुठल्याही भागात तेच बघायला मिळते आणि मग दुसरे त्या आपल्या सिद्धांत अथवा विचारधारे पेक्षा वेगळे कसे आणि त्यांना कसे निष्प्रभ करता येईल हे बघितले जाते ................ हे सर्व बघताना साम, दाम, दंड आणि भेद ह्या मध्ये सध्या "दामा" ला अधिक महत्व आहे मग तो फक्त निस्सीम कार्यकर्ता असून चालत नाहीं कारण लाल / बाल / पाल झालेच तर शास्त्रीजी / अटलजी जमाना जगात कुठेच नाहीं............... त्या अथवा त्या आधीच्या जमान्यातील संस्कार चित्रे नवीन मुलाम्यात उभारली जातात पण निवडणुका जिंकल्या अथवा हरल्या जातात ते आज काल "फ्लोटिंग वोटर्स" मुळे ...............

सत्तेचा अथवा निवडणुकांचा कल बघता काही जण इकडून तिकडे करतात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षा कडे ओघ जास्त असतो इच्छुकांचा !
पण खूप कमी मार्जिन अथवा कार्यकर्त्यांच्या वानवा निर्माण झाल्यामुळे तसेच त्या पेक्षाही शेवटच्या क्षणी निवडणुकीचा आपल्या परीने निष्कर्ष काढून मतदान करणारे मतदार हे निवडणुकीचे अथवा सत्तेच्या सारीपाटाचे गणित बदलून टाकतात
आता भविष्यातील निवडणुकात हे फ्लोटिंग वोटर्स जर संधीसाधू वृत्तीचे नसतील तरच राजकीय पर्यायाने सामाजिक चित्र हे लोभस असेल

फ्लोटिंग वोटर्स ची मानसिकता नीरक्षीरविवेक पद्धतीची अथवा योग्य मूल्यमापन पद्धतीची व्हावी म्हणून त्यातून वॉर्ड, मंडल, प्रांत आणि देशपातळीवर विचार करून कुठल्याही, सामाजिक सत्ता, धन,दौलत, मद्य. मदिरा प्रलोभनांना न भुलता त्यांनी मतदान करावे ह्या उद्देशाने निवडणूक रिंगणाशी संबंधी सर्वाना प्रयन्त करावे लागणार हे निश्चित !

फ्लोटिंग वोटर्स च्या निश्चित मानसिकता निर्मिती साठी महाविद्यालय, विश्वविद्यालय, सामाजिक संस्था तसेच विकास प्रबोधन पातळीवर केलेल्या प्रयत्ना मुळे भविष्यातील निर्मळ राजकीय / सामाजिक व्यवस्थेची मुळे रोवली जातील असे वाटते.

( "फ्लोटिंग वोटर्स" पोस्ट चा कुठल्याही राजकीय चळवळीशी अथवा विचारधारेशी संबंध नाहीं, ह्यातील एखाद दुसरे नाव वानगीदाखल आहे. पोस्ट बहुतेक भाग मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत आणि ह्याचा राजकीय परिस्थिती अथवा पक्ष ह्यांच्याशी संबंध नाही. एखाद्या विषयाचे समयोचित आकलन आवश्यक आहे आणि आपल्या प्रतिक्रिया, सूचना, टीका ह्या वर ह्या पोस्ट संबंधी अधिक निवडणूक शास्त्र संबंधी माहिती / ज्ञान आपणा कडून मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप !)

(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Displayed on 20th December 2017 at FB

२६ नोव्हेंबर २००८ ची रात्र !

२६ नोव्हेंबर २००८ ची रात्र !


२००८ नंतर दरवर्षी ह्या दिवसाचे आणि त्या वीर पोलीस अधिकाऱ्यांचे स्मरण केले जाते त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि दुसऱ्या दिवशी पासून मुंबई आणि मुंबईकर त्या धक्क्यातून विसरून परत एकदा आर्थिक राजधानीत आपल्या रोजी रोटी कडे जाऊ लागला याचे स्मरण होते.
पण ..................................................

मुंबईची जीवनदायिनी असलेली आमची रेल्वे तर त्या दहशतवादी हल्ल्या नंतर परत काही तासात सुरु करण्याचे धाडस आमच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवले ते अतुलनीय होते.

मला आठवते इव्हनिंग सिंगल करून मी साधारणतः रात्री ८ नंतर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस च्या आमच्या रनिंग रूम मध्ये आराम करायला जात होतो माझे जेवण होऊन मी थोडा वेळ ड्युटी वर असलेले माझे वरिष्ठ सहकारी श्री महेंद्र मंडल याचे जेवण होई पर्यंत थांबलो होतो. ते आधीच्या वाणिज्य विभागात हि माझे वरिष्ठ सहकारी होते. त्या नंतर मी रनिंग रूम मध्ये मोबाईल चार्जिंग ला लावून आवाज म्यूट करून झोपलो साधारणतः रात्री अकरा च्या नंतर उठलो, बेडवरुन उठताना आपल्या रात्रीच्या वर्किंग ला जायचे म्हणून मोबाईल वरील घडाळ्याकडे लक्ष जाताच माझ्या असे लक्षात आले कि माझ्या पत्नी सहित अनेक जणांचे मिस्ड कॉलस आहेत. मी सुरवातीला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही मी आमच्या रनिंग रूम मधील बेअरर / मदतनिसाला विचारले कि काही गडबड आहे का ? तो म्हणाला "साब नीचे फायरिंग हुवा बोलते हॆ ! अभी सिक्युरिटी /पोलीस एरिया सील किया है!

तेवढ्यात माझा मोबाईल फोन घरी लागला, माझ्या पत्नीने माझी ख्याली खुशाली विचारली आणि जे सांगितले ते ऐकून मी सर्द झालो, ती सांगत होती कि टीव्ही चॅनेल्स वर सांगत आहे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आहे आणि पहिली बातमी आहे आपल्या सि एस टी स्टेशनची ! तू काळजी घे ! मी हो म्हंटले आणि फोन ठेवला.
लगबगीने युनिफॉर्म आणि खाली धावलो, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल, गाडी रस्ता आणि रिझर्वेशन सेंटर यांच्या मध्ये असलेल्या मालवाहुतकीच्या भागातून आमच्या लॉबी कडे जाण्याच्या मार्गावर सर्वत्र विखुरलेले कपडे, रक्त, प्रवासी सामान आणि काही मृतदेह दिसत होते ..........................

अनेक ऍम्ब्युलन्स तसेच दक्षिण मुंबईतलं स्वयंसेवक संस्थांचे कार्यकर्ते धडाडीने जखमींना सेंट जॉर्जेस कडे नेत होते. मी आमच्या सीएसटी स्टेशनच्या पुण्याजवळून येणाऱ्या पार्सल पोर्टर मामांना बघितले ते पण प्रचंड घाईत होते नंतर कळले कि पार्सल च्या हातगाड्यावरुन पण जखमींना सेंट जॉर्जेस कडे नेले होते असे सांगतात.

सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या दिशेने ते मुंबई स्टेशन च्या मेनलाईन भागात शिरले तिथे मुख्य प्रतीक्षा हॉल मध्ये त्यांनी आपल्या एके -४७ अथवा तत्सम बंदुका मधून अंधाधुंध गोळीबार केला आणि त्यात टीसी ऑफिस जवळील स्टाफ च्या दिशेने म्हणजे आज सि एस एम टी मधील सिनियर स्टेशन मॅनेजर ऑफिस च्या भागात सर्व गोळीबाराचा रोख होता. त्या सर्व कोलाहला मुळे आणि हि घटना समजल्याने पुढे साधारणतः पश्चिम बाजूला असलेला उपनगरीय विभाग कडे ते अतिरेकी जाण्यापूर्वी, सबर्बन अनाउंसर श्री विष्णू झेंडे यांनी सिएसटी स्टेशन खाली करा ताबडतोब ह्या प्रकारच्या अनांउन्समेंट मुळे उपनगरी विभागात मनुष्य हानी तशी कमी झाली हे नंतर समजले असो

मी जसा उपनगरी विभागा कडे सरकू लागलो तेव्हा परिस्थितीची जाणीव नक्की होत गेली मला मेनलाईन विभागातून उपनगरीय विभागाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि मी मागे दक्षिणे कडे येऊन परत मुंबई लोहमार्ग पोलीस ठाणे म्हणजे मुंबई जि पी ओ च्या बाजूच्या दिशेला आलो तेथील एका मुंबई रेल्वे पोलिसाला जाणीव करून दिली कि मी बऱ्याच वेळा सध्या उपनगरीय लॉबी मध्ये शिफ्टस मध्ये ड्युटी व्यवस्थापन बघण्याच्या कामात मदत करतो तेव्हा मला आता उपनगरीय विभागातील लॉबीत जाणे आवश्यक आहे. तो म्हणाला कि साहेब, ह्या बाजूच्या गेट मधून अतिरेकी शिरून तुमच्या लॉबी परिसरावर प्लॅटफॉर्म डेड एन्ड बाजूने गोळीबार करून आणि जी एम ऑफिस च्या प्लॅटफॉर्म परिसरातून जाणाऱ्या भागात गोळीबार करून आता उत्तरेच्या म्हणजे मशीद स्टेशनच्या दिशेला फूट ओव्हर ब्रिज वरून गेलेत म्हणून पूर्ण भाग सील केला आहे.

मी विचार केला जर हा प्रकार रात्री एक डिड तास सुरु होता आणि अजूनही ते मस्जिद बाजूच्या म्हणजे उत्तरेच्या बाजूने गेले तर बाहेर गाड्यांची किती रांगा लागल्या असतील आणि प्रवासी बहुतेक वेळा निघून जातात पण मोटरमन / गार्ड यांना गाडी सोडता येत नाही, जेवणाच्या वेळा टळल्या असतील डबे लॉबीत असतील एक ना दोन ....................................
मी मनाचा हिय्या करून पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आमच्या लॉबीत शिरलो, ज्यांना स्टेशन परिसराची ओळख आहे त्यांना लक्षात येईल कि जि पी ओ साईड च्या गेट पासून आमच्या सबर्बन लॉबीत शिरे पर्यंत पण त्यांनी एक हत्यारबंद पोलिसांच्या बरोबर मला जाण्यास सांगितले होते.

मी लॉबीत आलो तर श्री महेंद्र मंडलजी आणि इतर काही आमचे रेल्वे सहकारी लॉबीत होते. लॉबीच्या ग्रीलवर तसेच स्टेशन मास्तर सबर्बन कार्यालयावर झालेल्या गोळीबार खुणा आम्ही बघितल्या. लॉबीत नंतर श्री संजय पांडे ह्यांची भेट झाली, गोळीबाराचा रोख उपनगरीय विभागात तर त्यांच्याच दिशेने होता पण काही कामकाजास्तव ते लॉबीत आतल्या बाजूला होते म्हणून वाचले. लोंबीतील आमचे खिडक्यांच्या जवळ काम करणारे सहकाऱ्यांना तर अगदी शत्रू पेक्षा कडून फायरिंग येताना सैनिक बंकर मध्ये चपळाईने खाली बसतात तसेच करावे लागले होते.

असे म्हणतात जि एम ऑफिस मार्गिकेच्या भागातून अजमल कसाब आणि त्याच्या दोन साथीदारांना प्रतिकार झाला म्हणून ते उपनगरीय विभागाच्या उत्तर बाजूला असलेल्या भागातून ब्रिज वरून कामा हॉस्पिटल कडे जावे लागले. ( थोडक्यात जि एम ऑफिस आणि महापालिका मुख्यालय वाचले )
दहशतवाद्याकडे सॅटेलाईट फोन आणि ऑनलाईन मॅपिंग होते म्हणतात नंतर पुढे एक दीड दिवसाचा थरार घरून टीव्ही वर लाईव्ह कव्हरेज बघितले तेव्हा लक्षात आले कि ते जर उपनगरीय विभागातून पश्चिमेकडे जर गेले असते तर महापालिका, टाइम्स बिल्डिंग हे टार्गेट झाले असते. असो

लॉबीत पूर्ण सन्नाटा होता रात्री साधारणतः नऊ साडे नऊ नंतर काहीच झाले नव्हते, अनेक मोटरमनस आणि गार्डस यांनी कायम ह्या वेळेस गजबजलेली लॉबी शांत होती कुठून निरोप फोन येत होते आणि विचारणा होत होती कि गाड्या कुठून सुरु होणार. स्टेशन परिसरातील आमचे तत्कालीन वरिष्ठ स्टेशन मॅनेजर श्री ए के तिवारी साहेब आणि एक वाणिज्य विभागातील आधिकारीं आले होते. आमच्या गार्ड साईड ला श्री मंडल साहेब यांनी अजून न आलेल्या गाडीवरील आणि अजून जाऊ न शकणाऱ्या गाडी वरील गार्डस ची यादी करण्याचे काम सुरु केले होते. वरिष्ठ स्टेशन मॅनेजर साहेबानी मला श्री मंडल साहेबाना मदत करण्याचे सुचवले तेच काम मोटरमन साईड ला सुरु होते मग आमच्या लक्षात आले कि काही मोटरमनस आणि गार्डस यांचा निश्चित ठावठिकाणा लागत नाही. आम्हाला असे कळले कि गाड्या सुटण्याच्या बाजूला गेलेले एक दोन मोटरमन अजून गेले काही तास कॅबस मध्ये अडकून आहेत मग वरिष्ठ स्टेशन मॅनेजर आणि आम्ही एक दोन जणांनी पोलीस बंदोबस्तात मस्जिद साईड च्या कॅब कडे जाऊन चेक केले तर तिथे कोणी नव्हते.
लॉबी च्या बाहेरील उप स्थानक प्रबंधक श्री संजय पांडे आणि इतर सहकाऱ्यांच्या माहितीवरून फोर्ट, महापालिका, आजाद मैदान आणि बोरा बाजार साईडला अडकून पडलेल्या अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शोध आणि सुटके साठी पोलीस मदत आणि यंत्रणा याची मदत घेणे सुरु झाले

शशिकांत वाळुंज आणि नामदेव डी हे दोघे काही काळाने लॉबीत आले तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला मग सगळ्यांच्या याद्या करून पोलीस / सिक्युरिटी क्लीअरन्स आदी घेऊन ट्राफिक सुरु करायच्या तयारीत लोकांच्या जेवणाचा एक प्रश्न उभा राहिला, कारण झोप अथवा आराम आवश्यक होता पण आमचे बहादूर रेल्वे गार्डस आणि मोटोरमन परत मध्यरात्री नंतर गाड्या चालवायला सज्ज झाले होते अर्थात पोटात काही जाणे आवश्यक होते, डबे विखुरले होते कँटीन मधील जेवण खराब झाले होते स्टाफ नव्हता मग वाणिज्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी मेंन लाईन मधील कँटीन मध्ये रात्री एक दीड पुढे खूप साऱ्या वडा पाव ची व्यवस्था केली होती.

पुढे अंदाजे दोन तीन नंतर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून पहिल्या गाड्या सुरु झाल्या मग येणारे गार्डस आणि मोटोरमन यांची काळजी घेऊन ते चार पाच तास अनेक सिग्नलस वर थांबून रिकाम्या गाड्या घेऊन येऊन आणि माहिती अभावी थकले होते त्यांना परत एकदा तयार करवून पुन्हा परत १५-२० मिनिटात चहा वडापाव देऊन परत गाडीवर पाठवण्याचे काम आम्ही सारे निगुतीने करत होतो ते अगदी २७ नोव्हेंबरच्या सकाळी जवळ जवळ नऊ वाजे पर्यंत ..................
आणि त्या माझ्या बहादूर गार्डस / मोटोरमन्स तसेच मुंबई स्थानकाच्या हिम्मतवाल्या वाल्या सर्व कर्मचाऱ्यांना सलाम त्यांनी मुंबई परत एकदा सर्वांत आधी गजबलेली ठेवण्याचे महत्कार्य केले
ती २६ नोव्हेंबर २००८ ची रात्र मी विसरणे शक्यच नाही

पुन्हा एकदा सलाम त्या जाबांज हुतात्म्यांना, वीरांना !
आणि
माझ्या सर्व रेल्वे कर्मचारी सहकाऱयांना, त्यांनी सडेतोड उत्तर देत पुन्हा एकदा मुंबई आणि रेल्वे कुठल्याही दबावाला भीक घालणार नाही हे आपल्या कर्तव्यनिष्ठेने सिद्ध केले त्यांना सलाम !


( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, माझ्या सर्व सहकारी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचे कौतुक आज होणे आवश्यक आहे म्हणून हा खटाटोप) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Displayed on 27th December 2017 at FB

मुंबईतली ती झाडे जणू ………………. ध्रुवबाळे !

मुंबईतली ती झाडे जणू ………………. ध्रुवबाळे !


बी कॉम ची परीक्षा दिली १९८७ ला आणि लगेच मुंबईत एक छोटीशी नोकरी करू लागलो होतो काहीच महिने ! मला वाटते वर्षभर जवळजवळ मस्जिद बंदर स्टेशनला अगदी पाचवा आणि सहावा प्लॅटफॉर्म होता आणि संध्याकाळी "ट्रिपल एम" फास्ट लोकल सुद्धा होती, मस्जिद, माटुंगा आणि मुलुंड..................... तेव्हा पासून अगदी खुणावतात मुंबईतली ती झाडे जणू ………………. ध्रुवबाळे !

असे म्हणतात कि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यानच्या कालखंडात आणि नंतर जगाचा इतिहास बदलला, अनेक देश स्वतंत्र झाले, अनेक देशातील सत्ता प्रकार बदलले, अनेक देशाचे समूह झाले आणि एक देश निर्माण झाला " इस्राएल"

अगदी आत्ता म्हणजे १९५० नंतर २०१७ साली त्या देशाला भारताने राजकीय मान्यता दिली असो.

मुंबई, अलिबाग, वसई आणि इतर ठाणे, कुलाबा ( आतां रायगड ) जिल्ह्यातील समुद्र किनारी पूर्वापार अनेक ज्यू पिढ्या वसत होत्या, कोकण आणि मुंबईत फक्त सिनेगॉग मधील प्रार्थना सोडली तर ज्यू जवळ जवळ पूर्ण पणे भारतीय वाटत होते आणि अनेक जण आहेत हि अजून.............

१९५० नंतर इस्राएल निर्मिती नंतर प्रथम युरोप मधील ज्यू इस्राएल मध्ये स्थिरावले आणि 

१९७० च्या दशकातील खाडी युद्धाच्या आणि म्युनिक ऑलिम्पिक १९७२ नंतर जगभरातील अगदी भारतातील ज्यू देखील अनेक संख्येने इस्राएल मध्ये स्थायिक झाले.

मुंबई बदलली विशेषतः १९७० दशका नंतर…… असे म्हणतात स्मगलिंग मधील काळा पैसा, रियल इस्टेट मध्ये शिरला, प्रमोटर सोसायटीज, सरकारी गृहवित्त आणि गृहबांधणी संस्था मागे पडल्या खाजगी बिल्डरस आणि खाजगी गृहवित्त संस्था बरोबर मुंबई झपाट्याने होऊ लागले काँक्रटी जंगल !

पण गेल्या ६५ वर्षात किंबहुना त्या आधीही असतील ती त्या ज्यू दफनभूमी वरील ती झाडे मात्र अगदी तरारून उभी नाहीत तर त्यांचे प्रचंड वटवृक्ष झालेत अगदी कुठल्याही रस्तारुंदीकरणामुळे, काँक्रीट जंगल अपेक्षेने अथवा होळी अथवा अगदी चुलीवरच्या बिर्याणी साठी देखील ह्या झाडांची एक फांदी देखील तुटली नाही कारण ती दफनभूमी वर विराजमान आहेत म्हणून ...............?

जवळजवळ एक दीड एकर च्या वर आकाराचा कदाचित थोडा मोठाही भूखंड आणि त्या वर मोजकीच झाडे आणि हजार च्या वर थडगी आणि कोणाच्याही त्रासाची शक्यता नाही, मृत शरीर आणि आत्म्याचे आशीर्वाद म्हणून नैसर्गिक खत हि मग ते डेरेदार वृक्ष त्या ज्यू / यहुदी दफनभूमीच्या एका छोट्या प्रार्थना सभागृहाच्या धर्तीच्या बांधणी वर आज पर्यंत छान पलीकडे महालक्ष्मी समुद्र परिसरातून येणाऱ्या वाऱ्यावर आणि नैसर्गिक पावसाळी पाण्याच्या मुरण्यावर अजून प्रचंड ताकदीने उभी आहेत.

आधी म्हंटल्या प्रमाणे मुंबई परिसरातील कोकण भागात बेणे इस्रायली चे ( हिब्रू भाषेत इस्राएल पुत्र ) चांगलेच अस्तित्व होते आणि अगदी छोट्या प्रमाणावर अजून फार थोडे आहे देखील इथल्या संस्कृतीशी इतके मिसळून म्हणजे पाठारे प्रभू , भंडारी, मालवणी अथवा अन्य मराठी ज्ञाती समुहातील आडनावे आणि बेणे इस्रायलीची आडनावे वेगळी ओळखणे कठीण पण पारश्या सारखी गावाची नावे खूप अलिबागकर, नागावकर, माहिमकर, वसईकर आदी पण मराठी संस्कृतीत आणि पाककलेत मुरलेले मांसाहारात खास शेल फूड आवडीचे आणि तितकेच गोड हि ...........................

कोकणच्या गडग्या ( जमिनीच्या एकदिड फुटी दगडी कुपणां) जवळ आणि परसात चाफा नाही असे एकही घर पूर्वी मिळायचे नाही आणि तेच इथे देखील.................. कोणी नातलगाने अथवा वंशजाने स्मृती म्हणून लावलेली अथवा जुन्या मुंबईतील नैसर्गिक वनसंपत्तीतील मोजकी चाफ्या ची झाडे आहेत इथे .......................

मुंबई उन्हाने होरपळून निघून जात असताना पावसाच्या एक महिना आधी हा चाफा सुंदर फुलतो आणि सहज संध्याकाळी लोकल च्या ट्रॅक फिरवण्याचा सिग्नल वर मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाश्याला सुंदर बहारदार चाफ्याचे दर्शन तर होते पण संधीप्रकाशाच्या सुंदर पार्श्वभूमीवर तो चाफा राजस हि भासतो ......... अगदी कोणीही न तोडण्याचे वरदान असल्यामुळे आणि चिंचपोकळीच्या त्या मुंबई कडच्या प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी उन्ह्याळात येणारी शांत प्रसन्न थंडगार झुळूक.......... मात्र .......

कालांतराने भायखळा ते महालक्ष्मी मध्ये होणाऱ्या काँक्रीट जंगल टॉवरस मुळे कमी होईल अशी सार्थ भीती वाटत आहे पण! मुंबईतली ती झाडे जणू ……………… ध्रुवबाळे!
भायखळा सोडले अथवा वरच्या बाजूला जाताना स्लो लोकल गाडीने चिंचपोकळी सोडली कि लगेच आता चिंचपोकळी बारा डबा प्लॅटफॉर्मच्या मुंबई च्या दिशेला बाहेर बघितले कि दिसतात ती ती झाडे मात्र मुंबईतील ध्रुवबाळे !
गूगल मॅप लोकेशन पहा आणि सॅटेलाईट ऑप्शन - थ्रीडीवर अनुभवा... झाडे आणि हिरवाई देखील !

https://www.google.co.in/maps/place/Jewish+Cemetery/@18.985134,72.8306357,741m/data=!3m2!1e3!4b1!4m12!1m6!3m5!1s0x3be7ce5f3b82a2d1:0xc432020c489eee8f!2sChinchpokli!8m2!3d18.9872162!4d72.8327925!3m4!1s0x3be7ce5ee7eee701:0x9c878a4e990d2bb1!8m2!3d18.9851303!4d72.832254


( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, ) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Displayed on 30th December 2017 at FB

पारंब्या !

पारंब्या !




Image may contain: plant and outdoor




एक अनोळखी नंबर बराच काळ वाजत होता अन एकदा कट मग थोड्या वेळाने परत रिंग !
उत्सुकता म्हणून कॉलर कळतो त्या अँप वर टाकला
अन
विश्वास बसेना अचानक कॉलेज काळानंतर इतक्या वर्षांनी फोन !
क्षणाची उसंत न घेता रिंग केली.
तो समोरून जोरात ओरडला
"मी कॉलेजातील मोदक मावा !"
घरंदाज प्रतिष्ठित घराण्यातील दोन मुलींच्या नंतर झालेला हा छान दूध गोरा, कॉलेजात आलाच तो हसतमुखाने पण कधी कोणाशी मिसळणं माहित नाही. त्याच्या शाळेतील दोघे तिघे अन तो बास ते पण कॉलेज वेळात, कॉलेज ची भरायची अन सुटायची वेळ झाली कि शोफर असलेली काळी चकचकीत अम्बॅसॅडर गाडी अन त्या पांढरी शुभ्र टर्किश टॉवेल्स कव्हर्स जणू पांढऱ्या शुभ्र रंगाशी स्पर्धा करत उभी असायची कॉलेज पासून काही अंतरावर ह्याची वाट बघत अथवा त्या कॉलेजला सोडून निघून जायची.
मुली सहज त्याच्या व्यक्तिमत्व श्रीमंती अन सोबर पणा बघून लक्ष ठेऊन असायच्या ! तो सहज पुढे गेला कि पुटपुटायच्या "मोदक मावा" !
कुणी मुलींनी म्हणे विचारायचा प्रयत्न केला ह्याचे उत्तर होते कि "मागे लागेल ती लक्ष्मी घेऊ नये पण लक्ष्मी आपण स्वकर्तृत्वा वर कमवावी" असे आप्पा म्हणतात, ती बापडी मुलींच्या कॉमन रूम मध्ये हे सगळे सांगती झाली अन झाले नाव बदलले कॉलेज मधले "अप्पांचा मोदक मावा"
असो
मी पण त्याच्या फोन वरील आवेशपूर्ण ओळखीला जोरदार शब्दात ओरडून संवाद साधला
"बोल अप्पांचा मोदक मावा"
अरे मी दोन चार दिवस पुण्यात आहे अन तुला भेटायचे आहे,
मी म्हणालो अरे माझ्या कडे काय काम !?
तो म्हणाला कि काम आहेच पण हळू हळू दोन शब्द लिहितोस म्हणून एक विषय कानावर घालायचा आहे.
माझी उत्सुकता ताणली गेली मग पुण्यातील माझ्या ट्रिप मध्ये वेळ आहे बघून त्याला फोन केला त्याने खरोखर स्टेशन वर गाडी पाठवली, गाडी पुण्यातील उंची हॉटेल मध्ये पोहचली वरून मोदक माव्याचा फोन कि सरळ लिफ्ट ने हॉटेलच्या गच्चीवरील रेस्टारंट मध्ये ये मी वाट बघतोय मित्रा !
समोर छोटा स्विमिंग पूल त्या वर सूर्यास्ताला दोन तुषार टिपणारे पारवे अन उंची व्यवस्था !
बुक केलेल्या टेबल समोर मोदक मावा !
माझ्या पेक्षा उंचीला थोडा मोठा !
उठला दिलखुलास हसला दोन्ही हाताने जवळ घेतलें अन म्हणाला आलास तुझ्या धावपळीत खूप छान वाटले.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग म्हणाला " अप्पा, बेंगलुरूत असतात जुन्या संगणकांच्या सर्व भंगाराच्या रिसायकलिंग चा उद्योग बघतात, आई आणि मी इथे पुण्या जवळचे उद्योग बघतो पण पुण्यात नसतो तर गावी घरात"
मुद्द्याला हात घातलान, समोर बघतो आहेस क्षितिजा पर्यंत काँक्रीट ची जंगले अरे शहरातून हा काँक्रीट चा राक्षस तालुक्या नंतर गावात आलाय, फार्म हाउसेसना काँक्रीट सराउंडिंग !
मी निशब्द !
उंची घास पूस च्या मेक्सिकन डिश, कॉर्न्स आणि रशियन सॅण्डविच आले.
तो म्हणाला तुझी पुढे ड्युटी तेव्हा तुला नकोच अन मीही ड्रिंक्स विशेष घेत नाही.
तुला आठवतो ...
कॉलेज काळात माझ्या गाडीला ड्रायव्हर होता गोविंद !
तो कॅन्सर लास्ट स्टेज !
तुझ्या मुंबईत शिवडीला आलो दोन चार वेळा मुंबईत वड बघितले कुठे पार आहेत तर कुठे नाहीत.
एकदा सहज परळ शिवडीच्या चाळींच्या मधील आमच्या गावाच्या ओळखीच्या सोनाराकडे दुकानात बसलो होतो अन ड्रेनेज पाइपवरील पिंपळ बघितले अन वाटले कि का हि रोपे नीट काढून कुठे जंगलात अथवा गुरचरण जमिनी का लावली जात नाहीत ?
वड आपल्याला एवढा उपकारक पण त्या पासून वापरण्यायोग्य लाकूड मिळत नाही अन मीटर अन मीटर कधी कधी दोन किलोमीटर पर्यंत जंगले होतात त्याची म्हणून दुलर्क्ष केले जाते तर कुठे जाळले पण जातात.
सूर पारंब्याचे खेळ तर नामशेष झाले.
आपण निसर्गाशी मैत्री अन खेळात न राहता अन वागवता त्याचा विध्वंस करत आहोत अन आपलाच प्राणवायू संपवत आहोत.
शहरे च्या शहरे चांगली हवा अन प्राणवायू साठी आजच धडपडायला लागली आहेत.
शहरात नाजूक फुलवाली झाडे लावली जातात अन त्या भोवती पिंजरा आला कि त्याचे पिंकदांन होते तो जहरी तंबाखू अन गुटका रसायने त्या झाडाला जाळतात.
अरे काही तरी लिही आता उन्हाळ्याच्या सुरवातीलाच स्त्रियांना सुचवा कि...............
एकही वडाची फांदी बुक करू नका अन विकत घेऊ नका.
सावित्री व्हा अन अनेक सावित्री सत्यवानाचे प्राण पुढील अनेक अनेक अधिक अधिक वडाची झाडे लावून कायमचे वाचतील असे काही तरी करा.
अरे आयुष्यात जी उपयोगाची नाहीत असे वाटते तीच माणसे अन तश्या वस्तू पाने फुले कायम स्वरूपी आपल्याला फायद्याचे काम करत असतात नाहीतर आज माझ्या सारखा व्यापात असलेला माणूस कशाला तुला बोलवेल ?
पण आई ची इच्छा होती तिने तुझ्या टाइमलाईन वरील काही लेख वाचले अन ती म्हणाली अरे त्याला लिहायला सांग.
मग हळूच एक पार्सल पॅक काढला अन म्हणाला.....
आज आई ने मला प्रेमाने आलू पराठे केले होते डब्याला !
त्यातील हे दोन चे पार्सल मुद्दामून तिने जिव्हाळ्याने पाठवलेत ते तुझ्या रात्रीच्या ड्युटी आधीच्या जेवणात घे!
सोबत मोदक माव्याच्या आईने चिठ्ठीत वडाचे खूप सारे उपयोग लिहले होते.
अ) आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो.
ब) आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.
क) असे म्हणतात एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यास मदत करणे हेदेखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो.
ड) वटवृक्षाच्या मुळाचे लाकूड लवचिक व अधिक बळकट असते. तंबूंचे खांब, बैलगाड्यांचे जू व दांडे इत्यादींच्या निर्मितीसाठी ते उपयोगी आहे. खोडाचे लाकूड करडे व साधारण कठीण असते. त्याचा उपयोग अनेक किरकोळ वस्तू तयार करण्यासाठी व सर्वसाधारण सजावटी सामानासाठी होतो. वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार करता येतो. सालीच्या धाग्यांपासून दोर तयार करतात. पारंब्यांचाही दोरी म्हणून वापर करता येतो. चिकापासून अतिशय चिकट गोंद बनवतात. त्याचा उपयोग पाखरे पकडण्यासाठी केला जातो. पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात. कोबळ्या फांद्या व पानांचा शेळ्या, मेंढ्या व इतर गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. हा चारा हत्तींना मोठ्या प्रमाणात लागतो. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. वडाच्या सालीत ११% टॅनीन असते. तिचा रस स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असतो. आमांश व अतिसारात तो उपयोगी आहे. वृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. वडाच्या मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.
झाली चिट्ठी वाचून मग मोदक माव्याने खूप साऱ्या कॉलेज मधील त्याच्या बाबतीत झालेल्या प्रसंगांच्या आठवणी सांगितल्या !
मग पेरू केळे ह्यांचे एक छान क्रीम म्हणजे ताजी साय खाऊन केलेले मॉकटेल मागवले त्यांनी अन आमची शहरातील उंच ठिकाणची ती भेट संपून त्याच्या आग्रहास्तव पुण्या जवळच्या घरात गेलो खूप छान बागकाम होती अन छोटी कमळे असलेली पुष्करणी पण होती.
खूप प्रसन्न वाटले अन ह्या वयात अन उद्योगात राहून आईच्या इच्छेने माझी भेट मुद्दाम घेऊन मला ह्या विषया वर लिहण्यास उद्युक्त करून माझ्या मनातील विचारांच्या पारंब्या खेळ घेऊ लागल्या.
मोदक माव्याच्या आग्रहाने मला पण असे वाटायला लागले कि जास्तीत जास्त वड आपण लावले पाहिजेत अन अशा काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था शोधल्या पाहिजेत ज्या सहज उपयोगात न येणाऱ्या झाडांची जंगले निर्माण अन संवर्धन करतात.
मोदक माव्याच्या ह्या अनेक वर्षाच्या भेटीवरून एक जाणवले कि
आयुष्यात एकमेकांना ठरवून विसरणे फार मुश्किल !
मी म्हणतो मुश्किल गोष्टी कराव्यातच का!?
सहज, सोपे जगुया !
आणि
पर्यावरणाला जगवयचा प्रयत्न करुया !
आता रेल्वे गाडीतून काम करताना अन प्रवास करताना वड अथवा वडाची झाडे दिसली कि
विचारांच्या ह्या पारंब्या मनात झुलत राहतात !
जणू हेच ह्या पोस्ट चे प्रयोजन तेव्हा ह्या पारंब्या तुम्ही तुमच्या मनात पण खेळवा !
© रविंद्र गांगल
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(पोस्ट अथवा ह्या विषयातील पात्रे आणि प्रसंग जरुरी नुसार मुळ नावात बदल करून अथवा काल्पनिक नावे घेऊन त्या बरोबर बहुतेक भाग मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, एखाद्या विषयाचे समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप !)
( पोस्ट मधील माहिती विविध साईटस लिंक्स वरून साभार संकलित आणि वैद्यकीय उपयोग निष्णात वैद्य अथवा डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच करावी हि सविनय विनंती !)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)


Displayed on 15th April 2019 at FB

निसर्गाची संगत - नोकरीतील गेली २० ते २५ वर्षे !

निसर्गाची संगत - नोकरीतील गेली २० ते २५ वर्षे !
रेल्वेत नोकरीला लागलो त्याला आता तीस वर्षे होतील आता काही महिन्यात ........
१९९३ ला गार्ड मध्ये रुजू झालो, काही महिने माल गाडी वर काम केले तर काही महिने माल गाडीच्या वाहतूक संबंधित ऑफिस मध्ये काम केले तर मग प्रवासी गाड्या वर काम सुरु केले आणि थोडे फार ऑफिस मध्ये तसेच संबंधी कर्मचारी समित्यांमध्ये काम केले पण .............
जवळ जवळ गेल्या ३० वर्षातील नोकरी पैकी २२-२३ वर्षे प्रत्यक्ष निसर्गाची संगत लाभली
पुढे अनेक वर्षे काम करत असताना आणि सेवा निवृत्ती नंतर देखील निसर्गाची संगत लाभावी हीच जगनियंत्या कडे प्रार्थना !
काल परवा अमावास्येचा अंधाऱ्या रात्रीपण आणि दिवसा परत येताना निसर्गाच्या ऋतू बदलाची चाहूल जाणवताना जो बदल अनुभवता येतो तो केवळ शब्दात मांडणेच कठीण !
कोकण रेल्वेच्या दिशेने काम करताना काँक्रीट जंगल हे पनवेल - रोह्याच्या पलीकडे संपत जाते आणि मग नद्या, टेकड्या. डोंगर, शेते तसेच पावसाळ्यातील धबधबे तसेच झाडे पाने त्यांचे रंग आणि सळसळ जाणवून देत असतो बदल !
मे महिन्यात कोकण रेल्वेच्या दिशेने प्रवासाला जाताना लक्षावधी पिवळ्या, तांबड्या रंगाच्या दिसणाऱ्या लक्षावधी रंग छटा आता अजून पावसाची सुरवात होत असताना लगेच हिरव्या - पोपटी रंगात कश्या बदलतात हे बघणे खूपच आल्हाददायक असते त्या साठी खरंतर रात्रीची गाडी नको, दिवसाची आणि ती पण थांबत थांबत जाणारी व वेळ हवी रिमझिम पावसाची !
लोणावळ्यावरून मुंबई कडे येताना अंधाऱ्या रात्री, खोपोली आणि परिसराचे दिवे मंकीहिल वरून पहाताना उन्हाळ्याच्या रात्री जे थंड हवे बरोबर शेकडो - हजारो खडे हिरे बघितल्याचे सुख लाभते ते अवर्णीय ! गाडी लवकर मुंबईला पोहोचावी आणि ड्युटी संपावी असे क्षणभर वाटत नाही.
कशासाठी पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटा साठी म्हणत ब्रिटिश जमान्यापासून सरकारी दरबारी, हायकोर्टात पक्षकार, वकील, शेअर मार्केट, बँका मध्ये येणारे पुण्याहून सिंहगड, दख्खनची राणी तसेच प्रगती मधून पनवेल मार्गे पण येणारे निसर्ग अनुभवत असतात तर मुंबई हुन पुण्यात आयटी उद्योग बहरल्या पासून इंद्रायणी, डेक्कन, इंटरसिटी तसेच कोयना देखील ओथंबून वाहत असतात असे म्हणतात गर्दी मुळे रेल्वे प्रवासात मसाज हि होतो पण गेले काही वर्षे रस्ता वाहतुकीपेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त असल्यामुळे प्रवासी गाड्या भरभरून जात आणि येत असतात. असो
पावसाळ्याच्या मध्यावर मंकी हिल आसपास पुण्याच्या दिशेला जाताना "उल्हास प्रपात" पाहणे म्हणजे मनसोक्त आनंद लुटणे. पावसाळी, तरुणाई बुशी डॅम, पवना डॅम, पळसदरी डॅम तसेच माथेरान कडे जाताना त्यांच्या उत्साह बघणे म्हणजे न कळत आपल्या तरुणपणाची पाने परत कोवळी हिरवी पोपटी करून पाहणे.
पावसाळ्याच्या शेवटी पितृपंढरवाड्याचा आसपास आणि नवरात्राच्या आधी, अगदी कास पठार फुलण्याच्या वेळी, विशेषतः मुंबई पुणे रेल्वेमार्गावर शेलारवाडी - बेगडेवाडी परिसरात सुंदर फुले फुलतात, थोडी जंगली आणि सुवासाची नसतात म्हणून डोळ्याला रोज त्या दिवसात प्रवास करताना मन प्रसन्न करतात. फ्लोरा लाईन्स !!
गीतांजली, तपोवन झालेच तर काशी आणि पुष्पक या गाड्यानी थळ घाटातून जाताना डावी कडे विस्तीर्ण डोंगर रांगा आणि घळी तर उजवी कडे रिसॉर्टच्या वरती डोंगर रांगावर लक्ष ठेवणारी घाटण देवी परिसर ! पण मन प्रसन्न करतातच !
पान मसाला बांधण्यासाठी, पशु ना खाद्य म्हणून आसनगाव - कसारा भागातून रोज पान तोड, झुडपे तोड होतच असते, गरिबांचे पोट भरते, शहरामधल्यांचे लाड होतात आणि निसर्गाची लूट होते. असो
अरे लिहीत बसलो पण पाऊस लांबला आणि चक्क आमच्या भागात खूप बागा आणि विस्तीर्ण मैदाने असताना देखील एक दोन कूप नलिका विहिरी आटल्याची माहिती मिळाली.
एकी कडे ग्रामीण भागात वॉटर कप स्पर्धा चालू झालेत आणि शहरे, रस्ता, बिल्डिंगस, गटारे फूटपाथस सगळे काही डांबरीकरण, काँक्रीटीकरण म्हणजे निसर्गाशी सतत प्रतारणा !
पंचवीस वर्षांपूर्वी पाच सागाच्या झाडात गुंतवणूक केली होती ................
ती जगली असती ना ! पंचवीस वर्षे मगच कापली गेली असती
पण ती गुंतवणूक हि गुंतावणूक झाली आणि हाती आहे कागदावर लॅमिनेटेड केलेले प्रमाणपत्र !
पण झाडे जगवलीच गेली नाही पंचवीस वर्षे !
ह्यात क्रूरता काय तर, माझे आणि इतरांचे पैसे बुडले म्हणून नाही तर निसर्गाच्या नावाने स्वतःचे चांग भले करून घेणाऱ्या माणूस प्राण्याच्या आप्पलपोटी पणाची !
पुन्हा एकदा,
पुढे अनेक वर्षे काम करत असताना आणि सेवा निवृत्ती नंतर देखील निसर्गाची संगत लाभावी हीच जगनियंत्या कडे प्रार्थना !
१५ जून २०१८
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)


Displayed on 15th June'18 at FB

प्रीत

प्रीत


मला ती आवडली कारण तिचा हसतमुख चेहरा, फक्त चेहरा नव्हे तर मैत्रिणी, ओळखी च्या स्नेह्या कडून माहीत झालेला स्वभाव आणि संस्कार, पण माझी आवड अथवा ओढ वा प्रेम एकतर्फीच राहून गेले जणू, मी पण माझ्या आयुष्यात गुंतून गेलो, मला पण साथ देणारी, जीवा भावाची सखी मिळाली, ती दिसली अथवा तिचा उल्लेख आला तेव्हा मी माझ्या सखी ला सांगितले की ती आज ही माझ्या मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे, ती माझी झाली नाही वा तिच्या साठी मला प्रयत्न करणे जमले नाही म्हणून माझ्या मनात कुठलाही दूजाभाव नाही, ती तिच्या सुखात अन् मी माझ्या अथवा आमच्या सुखात रममाण असताना तिची आठवण येणे इत पर्यंत ठीक तरी नियती ने संपर्क करून दिला, तिला मी जाणीव करून दिल्यानंतर पण ती हसतमुख आहे, तिच्या व्यापातून पण छान लिहिते तिचे म्हणणे कुठेही दोघांना भय, चिंता अथवा तणाव नाही, पण परत ती संपर्कात आल्यावर माझ्या समोर असावी असे वाटले तरी ती तिच्या आणि मी माझ्या सुखात रहावे अन् तरी ही ती मला तशीच आवडते पहिल्या सारखी .... तेव्हा अव्यक्त होते आज व्यक्त आहे तेव्हा आम्ही निरागस होतो अन् आज परिपक्व आहोत, तेव्हा बंधने नव्हती आज एका रेशीम गाठीत आधीच गुंतलेले आहोत, तरी पण मनात ती घर करून आहे कारण आजही ती हसतमुख, तिच्या संस्कारांप्रमाणे तत्पर आहे तिच्या व्यापात पण तरी ती पारिजातक सारखी आहे असे वाटते की थोडी सुवासाची फुले मला देईल, प्रत्यक्ष फुले नकोत पण माझ्या मनाच्या आसमंतात तो सुवास कायम रहावा अन् नाही राहिला युगे अन् युगे तर मला ती बकुळ भासेल पण सुवास देत राहील.

© रविंद्र गांगल

Displayed on 30th Jan'2019 at  FB 


अथक, अवर्णनीय आणि अतुलनीय !

अथक, अवर्णनीय आणि अतुलनीय !

२२ डिसेंबर २०१७ - शुक्रवार - सहभाग सेवा - इनर व्हॉइस प्रोजेक्ट्स
ठाकूर वाडी शाळा - उंबर वीरा शाळा (नागनाथ) - विनोबा भावे कर्णबधिर निवास विद्यालय, कर्जत

"शेवटच्या चाकावरून" ह्या माझ्या लिखाणाचे आधीचे काही भाग फेसबुक अकाउंट वरून तसेच सोशल मीडियातील व्हाट्स अप वर पीडीएफ फाईल च्या स्वरूपात पाठवताना जितका आनंद मला झाला होता त्या पेक्षा अनेक पटीने आनंद, आजचा भाग आपणा समोर सादर करताना होत आहे.

अथक, अवर्णनीय आणि अतुलनीय !

मुंबईच्या प्रवासातील अथवा प्रगतीतील मुख्य हिस्सेदार आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे च्या उपनगरीय सेवा त्या पश्चिम रेल्वे तशी छोटी आणि मध्य रेल्वे चा पसारा प्रचंड साधारणतः मुंबई ते पनवेल, खोपोली आणि कसारा बरोबर ट्रान्स हार्बर लिंक्स म्हणजे पार मुंबई,नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि पनवेल आदी महापालिका पालिका क्षेत्रांचा वाहतूक भार झेलणारी तसेच दोन्ही बंदरे आणि अगणित साइडिंग आणि गुड्स डेपोस यांना सेवा देणारी, इथे अहर्निश अगदी कुठल्याही जयंती आणि पुण्यतिथी च्या सुट्टीशिवाय काम करणारे आमचे गुड्स .उपनगरीय सेवा आणि देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत सर्व दूर जाणाऱ्या मेल एक्सप्रेस वर काम करणारे कर्मचारी बंधू हे आपल्या घरापासून जवळजवळ ५० ते २०० किमी पार करून रोज अगदी नित्यनेमाने काम करत असतात.

सर्व प्रचंड तणावात पण आनंदाने एकजुटीने काम करणाऱ्या सर्वांचा एक छोटा हिस्सेदार म्हणून मला त्यांच्यातील कर्तव्य भावनेचा आणि समाज ऋणपूर्ती चा एक प्रसंग / एक दिवस, तुमच्या समोर मांडतांना खूप आनंद होत आहे,

साधारणतः दोन वर्षांपूर्वी एक ग्रुप तयार झाला आणि सुयोग कारंडे. अनिरुद्ध प्रतापे यांनी जवळ १५० कर्मचारी सहकाऱ्यांच्या साथीदारांच्या मदतीने बऱ्याच प्रमाणात मेल एक्सप्रेस, उपनगरीय तसेच गुड्स गार्डस केटेगरीतील वैयक्तिक प्रयत्नाने समाजसेवा प्रकल्प करणाऱ्यांना, तुमचे चालू द्या पण आपण केवळ दर महिना ५०-१०० रुपये गोळा करून आपल्या रेल्वेच्या जवळ पासच्या खेड्यात तसेच दुर्गम भागातील शाळांमध्ये, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, शालेय उपयोगी वस्तू, जलशुद्धीकरण यंत्रे आदी देणगी म्हणून एकत्र पणे उपलब्ध करून देऊया असे आवाहन केले आणि दूर नगरातून येणारे म्हणजे अगदी पुणे, इगतपुरी, लोणावळा परिसर येथून रोज नित्यनेमानं येणाऱ्या आपल्या सहकाऱ्या सकट सर्व एकत्र कामास लागले तेही आपल्या ड्युट्या, सुट्ट्या सांभाळून गेल्या दीड दोन वर्षात पालघर, मोखाडा, गुजराथ - महाराष्ट्र बॉर्डर वरील ग्रामीण भागात, इगतपुरी जवळ आदी ठिकाणच्या शाळांमधून देणगी वस्तूंचे वाटप ही झाले.

ग्रुप मधील अनेक जण तसेच ग्रुप बाहेरील देणगीदार मिळू लागले, कोणी मुली - मुलाच्या वाढदिवसाच्या निम्मिताने तर कोणी आई वडिलांच्या स्मृतीदीना निम्मित पाचशे - हजार रुपये जमा करत होते आणि अजनूही देत आहे कारण "इनर व्हॉइस" ग्रुप चे एक दिलाने केलेले काम दिसत होते आणि प्रत्यक्ष जाऊन भागही घेता येत होता.
अलीकडच्या काळात आमचे मेल गार्ड सहकारी श्री श्रीगणेश खंदारे यांना जाणवले कि ठाकूरवाडी - नागनाथ परिसरातील विद्यार्थ्यांकडे काही साधनांचा अभाव आहे मग त्यांनी ग्रामस्थ आणि शिक्षकासाठी चिठ्ठी टाकली आणि लिहले कसे ही करून माझ्या शी संपर्क साधा, परिस्थिती जाणून घेतली आणि ग्रुप समोर मांडली, व्हाट्स अप ग्रुप कामाला लागला त्या परिसरावर आणखीन माहिती गोळा होत होती आणि ग्रुप ने श्री सुयोग कारंडे, श्री अनिरुद्ध प्रतापे आणि साथीदारांना श्री श्रीगणेश खंदारे यांचे सोबत ग्राउंड रिऍलिटी बघण्यास धाडले, रिपोर्ट आला. वस्तू ची यादी तयार केली गेली , प्रत्यक्ष साईट वर न जाणारे गार्डस आता मुंबईच्या होलसेल मार्केट मध्ये फिरू लागले, वाशी - उल्हासनगर बाजार पालथे घातले गेले.

ठाकूरवाडी चे काळे गुरुजी / कोरडे गुरुजीआणि सहकारी - ग्रामस्थ मंडळ - नागनाथ - उंबरवीरा चे कापरे गुरुजी आणि सहकारी तसेच कर्जत भागातील आमचे गार्ड श्री प्रकाश रोकडे यांनी उल्लेखलेली विनोबा भावे कर्णबधिर निवासी शाळेचे श्री पाटील दादा आणि मुंढे ताई यांच्या कडून परत एकदा सर्व माहिती घेतली, मग लांबलचक यादी, खरेदी सामान या सकट दिवसातून जिथे रेल्वे व्यवस्थापना साठी सोयीचे म्हणून केवळ दोन तीन गाड्या थांबण्यात येतात आणि फक्त पावसाळ्यात सुंदर धबधबे आणि उतरणारे ढग बघण्यात येणारी मजा अनुभवणारे लाखो प्रवासी तसेच दुर्गम भागात उशिराने पोचणारी शासन यंत्रणा यांना सगळ्यांना उदबोधक आणि प्रेरणा देणारे आमचे रेल्वे गार्ड ग्रुप " इनर व्हॉइस" चे पंधरा ते अठरा जण, २२ डिसेंबर २०१७ - शुक्रवार रोजी सकाळी साधारण ९:१५ च्या सुमारास ठाकूरवाडीस उतरले.

ठाकूरवाडी - नागनाथ ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने दोन्ही शाळातील सामान उतरवले गेले मग दोन्ही शाळातून छोटेसे वाटप कार्यक्रम झाले, ठाकूर वाडीच्या शाळेतील शिक्षक ग्रामस्थांनी दिलेला शिरा - चहा नास्ता आणि उंबरवीरा - नागनाथ मधील ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी दिलेले भात
- आमटी आणि बटाटा भाजी याचे चविष्ट, चुलीवरचे जेवण यांनी तृप्त होऊन " इनर व्हॉइस" मंडळी नागनाथ हुन कर्जत कडे रवाना झाली.

कर्जतच्या " विनोबा भावे निवासी कर्ण बधिर शाळे" तील मुला - मुलींनी फ्रेंडशिप बँडस बांधून जणुं आम्हाला जाणवून दिले कि ते आम्ही एकच आहोत आणि मैत्रीच्या धाग्यात पक्के बांधलेले आहोत. मोठा भावोत्कट प्रसंग होता कि रक्षा बंधन आणि फ्रेंडशिप दे व्यतिरिक्त सुंदर बॅण्ड ने आम्हाला घट्ट बांधून ठेवतेय. कै आचार्य विनोबा भावे यांच्या अंतिम काळातील सहकाऱ्यांपॆकी एक श्री पाटील दादा आणि तिथे शाळा व्यवस्थापन बघणाऱ्या श्रीमती मुंढे ताई यांनी शाळेबद्दल, कर्ण बधिर दिव्यांग मुला - मुलीं बद्दल माहिती दिली तसेच " इनर व्हॉइस" मंडळी यांनी देणगी दिलेले शाळा साहित्य. क्रीडा साहित्य तसेच अन्न - धान्य यांचा स्वीकार केला. स्थानिक श्री ओसवाल देखील या प्रसंगी उपस्थित होते.

इनर व्हॉइस, ठाकूर वाडी - नागनाथ तसेच कर्जत उपक्रमातील अनेक संधी, आव्हाने, सरकारी. राजकीय तसेच सामाजिक जबाबदाऱ्या यांच्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे पण माझ्या सहकाऱ्यांनी, मला प्रेरित करून त्याच्या बरोबर नेऊन गरीब आदिवासी कातकरी - कर्ण बधिर मुले - मुली तसेच संबंधित ग्रामस्थ - शिक्षक आणि विश्वस्थ मंडळीत, आपल्या अथक परिश्रमाने अवर्णीय आणि अतुलनीय आनंद फुलवून जणू २०१७ सालाचा शेवट गोड केला आणि जो आनंद त्या लहान दुर्गम भागातील मुले मुलींच्या चेहऱ्या बघितला आणि कर्ण बधिर दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला तो देणाऱ्या अनेक कर्तबगार, निरलस समाजसेवा करण्याच्या माझ्या रेल्वे गार्डस सहकाऱ्यांना अनेक अनेक सलाम !
निसर्गात दुर्गम भागात ध्वनी ला प्रतिध्वनी येतो मग माणूस पण हेच लक्षात ठेवलं तर बहार येईल !

( "अथक, अवर्णनीय आणि अतुलनीय ! पोस्ट चा कुठल्याही राजकीय चळवळीशी अथवा विचारधारेशी संबंध नाहीं, ह्यातील एखाद दुसरे नाव वानगीदाखल आहे. पोस्ट बहुतेक भाग मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, एखाद्या विषयाचे समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप !) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
*****************
विशेष सूचना : लवकरच, फक्त मुंबई रेल्वे गार्डस यांचा "इनर व्हॉइस मुंबई” हा फेसबुक ग्रुप त्यांच्या सदस्यांनी आत्ता पर्यंत केलेल्या प्रोजेक्ट्स चे डॉक्युमेंटेशन आणि डिजिटलायझेशन पूर्ण झाले कि मधून मधून काही काळ सर्व फेसबुक अकाउंट होल्डर्स साठी, सदस्य न होता देखील बघण्यासाठी उपलब्ध असेल त्यात इनर व्हॉइस मुंबई ह्या ग्रुप चे आधीचे कार्य आणि पुढील कार्याची माहिती मिळू शकेल असे समजते. युआरएल:
https://www.facebook.com/groups/innervoicemumbai/*****************

Displayed on 23 December 2017 at FB

चाकावरचे वाढदिवस क्षण - सण - उत्सव आणि नवं वर्ष २०१८ मधील माझ्या जीवनातील न विसरता येणारा क्षण !

चाकावरचे वाढदिवस क्षण - सण - उत्सव आणि नवं वर्ष
२०१८ मधील माझ्या जीवनातील न विसरता येणारा क्षण !

Image may contain: 1 person, closeup













आज ३१ डिसेंबर २०१८ आणि उद्या १ जानेवारी २०१९ मग काय सगळी कडे हर्षोल्लास तसेच अभिनंदनाचे आणि शुभेच्छांचे संदेश !
सैन्य तसेच आम्हा रेल्वे वाल्या सारख्या अत्यावश्यक सेवावाल्यांच्या जीवनात नवीन कॅलेंडर मधील महिन्याचे पान बदलून तारखा बदलल्याचे सुख देणारा दिवस असला तरी जीवन अनुभवाच्या तसेच वर्षभरातील घटना डोळ्यावरून तरळून जातात.

महत्वाचे सण उत्सव म्हणजे १६ एप्रिल - भारतीय रेल्वे वाढदिवस तसेच मुंबई आणि महाराष्ट्र परिसरात धावणाऱ्या गाड्यांचे वाढदिवस डेक्कन क्वीन १ जून, पंचवटी १ नोव्हेंबर तसेच प्रगती २७ डिसेंबर आदी, काही नेहमीचे प्रवासी तसेच हौशी रेल्वेच्या प्रेमात असलेली तरुण मुले हे वाढदिवस नित्य नेमाने सजावट करून साजरे करतात आणि यंदाही झाले.

रेल्वेच्या चाकावर रोज पोटापाण्यासाठी धावणारे प्रवासी आपल्या सह प्रवाश्यांचे वाढदिवस, गणपती, नवरात्र उत्सव तसेच अगदी सत्यनारायण पूजा देखील साजऱ्या होतात असे खूप वेळा बातम्यातून समजते.

सर्वात मोठा उत्सव रेल्वेत साजरा होतो तो दसरा महोत्सव, मुंबईत उपनगरी रेल्वेत तर दसरा सुट्टीच्या आदल्या दिवशी पूर्वी फक्त आमच्या रेल्वे कारखान्यातील कामगार मध्यरात्री गाडी देखभाली नंतर फुलांच्या माळ्यानी सजावट करायचे पण १९९० च्या दशकात फक्त कल्याण प्लॅटफॉर्म क्रमांक सहा अथवा सात वर सकाळी तत्कालीन ७:१८ ह्या पहिल्या फास्ट गाडीच्या दसरा उत्सवाचे लोण लगेच काही वर्षात सर्वच उपनगरी गाड्यांच्या टर्मिनल्स वर पोहचले, गाडीची सजावट, पूजा हार-तुरे फुले पेढे मिठाई ह्यांची लयलूट असते त्या टर्मिनल वरच्या जीवनदायनी गाडीच्या सकाळच्या वेळी !

यंदा २०१८ मध्ये तर डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेस मध्ये, माजी राष्ट्रपती आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ कै. ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर, मध्य रेल्वे ने 'वाचन दिन' अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेस ह्या गाड्या मध्ये तर " लायब्ररी ऑन व्हील" अर्थात चाकावरील वाचनालय सुरु झाले आहे.
चाकावर अनेक हृदयस्पर्शी क्षण उत्सव येतात आणि ते मनात कोरून राहतात.
मला आठवते त्या प्रमाणे माझ्या उपनगरीय सेवा काळात एक रम्य नव्हे तर सतत पाऊस, वॉटर लॉगिंग, फेल्युर्स च्या दिवशी संध्याकाळची एक कल्याण गाडी विक्रोळी स्टेशनात शिरली.
गेल्या एक दोन दशकात विविध कंपन्या मिल्स आणि त्यातील इमारती असलेली स्टेशने, करी रोड, चिंचपोकळी, विक्रोळी, कांजूर मार्ग अगदी थोड्या फार प्रमाणात भांडुप, नाहूर, मुलूंड आदी नव्या मुंबई तसेच पवई पासूनचा क्रॉस ट्राफिक सहित भागातील उत्पादन क्षेत्रा ऐवजी सेवा क्षेत्रात म्हणजे आर्थिक केंद्रे तसेच संगणकावर आधारित कॉल सेंटर्स / डाटा सेंटर्स च्या प्रवाश्यानी गजबजू लागली आहेत जिथे शिफ्ट प्रमाणे कामगार यायचे तेथे ब्ल्यू कॉलर कामगार ऐवजी स्काय ब्ल्यू / पिंक अश्या लाईट कलर्स मधील ऑफिस अथवा डेस्क स्टाफ वर्कर्स, ऑफिस स्टाफ दिसू लागला, त्यात हि मुली स्त्रिया हि साड्या ह्या फक्त लग्ने तसेच नवरात्रीच्या नवरंग उत्सवा शिवाय नेसायच्या नसतात असे जणू ठरवून चुडीदार अथवा पंजाबी ड्रेसेस ना मागे सारत शर्ट्स, स्कर्ट्स, स्टोकिंग्स, मोबाईल्स अथवा गॅजेट्स सहित हेड फोन हा कानाचा एक अविभाज्य भाग आहे अश्या थाटात वावरू लागल्या आहेत अर्थात मुले अथवा पुरुष कामगार वर्गात पण फरक पडला आहे. स्टेशन आसपास असलेली एका जमान्यातली पंजाबी , उडपी हॉटेल्स तसेच वडापाव दुकाने जाऊन जंक फूड जॉइंट्स वाढले आहेत, मोबाईल्स शॉप्स तसेच मोबाईल चार्जिंग आणि सिगारेट्स लायटिंग स्पॉट्स वर मुलीचा वावर हा डोळ्यात भरण्या एवढा वाढला आहे. असो.
हि घटना साधारणतः १५ वर्षांपूर्वीची आहे सरता पावसाळा होता, माझ्या आठवणी पणे गणपती होऊन गेले होते आणि काही दिवसात नवरात्र येत होते पण पाऊस त्या दुपारी जोर धरून होता गाड्या खूप साऱ्या धावत होत्या पण विलंबाने गर्दी होतीच आणि गाडी विक्रोळी स्टेशन मध्ये काही काळ थांबली होती.
दोन मुली / स्त्रिया वर सांगितल्या प्रमाणे वरील ऑफिस स्टाफ वेशात लगतच्या महिलांच्या वेशात चढायच्या प्रयत्नात होत्या आणि हातात एक लांबडा बॉक्स , लेडीज च्या तीन दरवाज्यात मिळून एकटीला मोठ्या जिकरीने चढता येऊ शकत होते पण दुसरी आणि लांबडा बॉक्स ह्यांना जागा मिळू शकत नव्हती मग कंटाळून थोड्या वैतागून माझ्या कडे आल्या. पंधरा वर्षा पूर्वी थोडा आजच्या पेक्षा जास्त आकर्षक मी दिसत होतोच पण तरी देखील मला इंप्रेस करण्याची कसरत करत म्हणाल्या " सर वो क्या है ना हमे मुंब्रा जाना है पर गाडी मे दोनो चढ नही पा रहे आप कुछ किजीये" मी म्हंटले "भीड है बाद मे जाईये" - नही सर बाद मे कल्याण गाडी नही है दो ठाणा गाडी है फिर कल्याण के आगे वाली गाडी है" मी म्हंटले आराम से जाईये, भीड के समय कैसे जा पावोगी आप लोग यह बॉक्स लेके !?," दुसरी जरा जास्त स्मार्ट आणि थोडी टंच हि होती ........ थोडी मला अधिक इम्प्रेस करायच्या प्रयत्नात माझ्या मागील कॅब च्या जागेत बघत सर इधर............ पण माझा जरा रागीट झालेला चेहरा लक्षात घेऊन लगेच तीने पटकन शब्द बदलले, " सर ऐसा किजीये, यह बॉक्स आप के पास रखिये हम मुंब्रा मे ले लेंगे"
विक्रोळी ते मुंब्रा - दोन अनोळखी तरुण मुली – बॉक्स, मग माझ्या लॉबीतली सुरक्षेची सर्व सर्क्युलर्स - ऑर्डर्स माझ्या डोळ्यासमोर तरळू लागली अन दुसरी, पहिली पेक्षा थोडी खरोखरच टंच आणि चंट हि होती……. तिने जणू माझ्या मनात काय चालले आहे हे हेरले, तिने क्षणार्धात तिच्या केसाची पिन काढली, बॉक्स च्या शेवटच्या कडेवर असलेल्या टेप वर लावली अन बॉक्स थोडा ओपन केला.................
अन विनवणी करू लागली हम सब सहेलीयोने इसके बेटी को बर्थडे पर यह डेड किलो का केक गिफ्ट दिया है ओर गाडी को भीड है एक घूस सकती है मै पीछे के गाडी से आऊंगी मग एक केक शॉप ची रिसीट दाखवली ................. आता मनः चक्षु वर प्रेम आणि करुणे ने आर्जव केले होते मी पण तो बॉक्स ठेवून घेतला, तिला इशारा केला गाडीत चढा, तेवढ्यात गाडीच्या मोटरमन नी सिग्नल बेल दिली कि गाडी पुढे जाऊ शकते अन गाडी निघाली ती टंच आणि चंट खाली राहिली, मला दोन वेळा थँक्स म्हणाली अन जी गाडीत घुसली तिच्या कडे बघत तिने दोन्ही हात डोळ्याला लावले आणि वरती उप्परवाल्या कडे बघत जणू आभार मानत आमच्या विक्रोळी स्टेशनातून जाणाऱ्या गाडी कडे कृतकृत्य भावनेने बघत होती.
यथावकाश मुंब्रा आले, केक बॉक्स मी दिला, तीने “ वो आएगी तब रुकती हू क्यो कि अगर वो नही होती तो आज मेरे बेटी का बर्थ डे का केक कटना मुश्किल हि नही नामुनकीन था !” म्हणत माझे पण आभार मानले.
मी पण अंधार झाला होता वर डोंगरावर मुंब्रा देवी मंदिरा कडे जाणाऱ्या मार्गावर नव्याने सोडियम व्हेपर टाईप स्ट्रीट लाईट लावले होते ते पावसात चमकत होते सोनेरी जणू एक दीप माळ मुंब्रा देवी मंदिरा कडे जाताना दिसत होती त्या कडे बघून मनोमन आभार मानले आणि नमन केले.
हे पुनः १५ वर्षांनी आठवायचे कारण काही प्रसंग काही क्षणात घडतात पण मानवी मनावर कोरले जातात असाच एक प्रसंग घडला माझ्या आयुष्यात यंदा २०१८ ला घडला ५ डिसेंबर रोजी !
१९८२ - १९८७ मध्ये शाळा कॉलेज सोडल्या नंतर अलिकडेच मोबाईल नेट, फेसबुक तसेच व्हाट्स अप वगैरे सोशल मीडियातून मित्र आणि मैत्रिणी परत एकमेकांशी संवाद साधू लागले अन मग मी पण न चुकता सर्वाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागलो आणि मलाही मिळू लागल्या पण ५ डिसेंबर २०१८ रोजी माझा कॉलेजातील कर्जत येथे राहणार मित्र श्री प्रकाश भुतकर माझा ४ डिसेंबर रोजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कर्जत स्टेशन वर माझ्या त्या दिवशीच्या कोयना गाडीच्या कॅब समोर चक्क केक घेऊन उभा राहिला, आम्ही बरोबर ३१ वर्षांनी प्रत्यक्ष भेटत होतो ते पण आकस्मिक रित्या
ते देखील फक्त पाच मिनिटे गाडी थांबते कोयना, कर्जत स्टेशन मध्ये बँकिंग इंजिन्स लागे पर्यंत, काम उरकून त्या पट्ठ्याने आणलेला केक माझ्या कडून कापून घेऊन माझा वाढदिवस साजरा केला. स्टेशन वर त्याच वेळी आमचे एक सेवा निवृत्त गार्ड साहेब होते अनायसे अन स्टेशन मास्तर, घाट लोको पायलटस अन उपस्थित सिक्युरिटी स्टाफ ला आणि प्रकाश ला केक चा घास भरवत कोयना निघाली पण तो प्रसंग कायम लक्षात राहिला माझ्या मनात आणि आता ह्या फेसबुक अन्य मीडिया वॉल वर माझ्या "शेवटच्या चाकावरून" च्या आत्मचरित्र पर लेखनात देखील !
पुन्हा एकदा शतशः ऋणी ! प्रकाश !
बघा, भारतीय रेल्वेच्या च्या काही गाड्या दीड ते दोन दिवस प्रवास करत असतात आणि चेक करा तुमचे कोणी जुने मित्र - मैत्रिणी प्रवासात तुमच्या शहरातून प्रवास करत आहेत का वाढदिवसाच्या दिवशी मग प्रकाश सारखे काही वर्षांनी त्याला अथवा तिला भेटून प्रवासात त्यांचा वाढदिवस साजरा करा आणि सोशल मीडिया तुन झालेल्या संपर्कांतून अनाठायी चर्चा पेक्षा आनंद घ्या अन आनंद द्या !
तुम्हाला सर्वाना नवीन वर्ष २०१९ च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
© रविंद्र गांगल
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

मकर संक्रांतीच्या - उत्तरायानाच्या हार्दिक शुभेच्छा !

*टू बी नॉट टू बीराहू नयेसगळेच चांगलेच असतात असं नाही....म्हणजेसगळे वाईटही असतात असं नाही....म्हणजे संक्रांत नक्की कोणावरदक्षिणायनावर ....सूर्य गतीने उत्तरे कडे निघाला तर....अमंगला कडून मंगला कडेथोडे कडसर तीळ गोड गुळात घोळले की....गोड बोलण्यास आपण सज्ज होतो....म्हणूनचतीळगुळ घ्या गोड बोलाटू बी ऑर नॉट टू बीसोडून द्याअन्मकरसंक्रांतच्या सुमुहूर्ता वरगतीमांनतेने जीवन प्रवास करा !मकर संक्रांतीच्या - उत्तरायानाच्या हार्दिक शुभेच्छा !*

Displayed on 15th March 2019 at FB

भुंगा होऊन जगले तर मकरंद घेता येतो......


भुंगा होऊन जगले तर मकरंद घेता येतो.
अन्
पकडले जाण्याची भीती नसते.
फुल पाखरू होऊन जगले तरी मकरंद घेता येतो
पण्
पकडले जाण्याची भीती असते.
तरी कोणीही व्हा पण मकरंद घेण्याचे सोडू नका.
घेई छंद मकरंद....
प्रिय हा मधु मिलिंद

*जय श्रीकृष्ण अर्पण*
🌸🌸🙏🏻🙏🏻🌸🌸

© रविंद्र गांगल


Displayed on 15th March 2019 at FB 

रानपरी

रानपरी


परवा माझी मेल एक्सप्रेस गाडी इगतपुरी हून सकाळी सकाळी निघाली आणि खर्डी स्टेशनवर गाडी जात असताना काही कष्टकरी बायका घोळका करून बसल्या होत्या अन त्यात परत एकदा रानपरी दिसली.

साधारणतः आठ ते दहा वर्षांपूर्वी उपनगरीय गाड्यावर काम करत असताना ह्या रानपरीची ओळख अथवा माहिती झाली होती. लोकल गाडी वर काम करताना पुढे जाणाऱ्या माल गाडीचे इंजिन नादुरुस्त झाले जरा वेळ झाला होता खूप सारे नोकरदार, व्यापार उदीम वाले जवळ पास हायवे गाठून आपापल्या उद्योगाला निघाले पण भल्या पहाटे पहिल्या कसारा ते मुंबई लोकल ने गेलेल्या कष्टकरी बायका दादर फुल मार्केट मध्ये पळसाच्या पानांचे गठ्ठे पोचते करून परत खर्डी परिसरात परत चालल्या होत्या.

गाडी खूपच वेळ थांबली अन त्या काळात छान आदिवासी ग्रामीण गाणी ऐकायला येत होती, अगदी मराठी चित्रपट 'जैत रे जैत' ची आठवण झाली. गाणे रानपरी म्हणत होती अन बाकी बायकांनी ठेका धरला होता.

रानपरी ................ महादू अन पारो कातकरी जोडप्याची पोर ! दोन भावांच्या नंतर झालेली उगीच शाळेत जाऊन लिहिता वाचता येऊन पुढे कुठे शिक्षणाचा ध्यास घेणार तितक्यात ह्या रानपरीचे लगीन ठरले...

पाड्यावरील राम्या कातकरी कुटुंबाने हिला सून करून घ्यायची मागणी घातली होती कारण पण तसेच होते. नाकी डोळी नीटस एकसमान छान चमक असलेल्याला सावळा वर्ण अन वेळ पडली तर मुलांसारखी झाडावर चढ तर कुठे मोठ्या भावाची सायकल चालव हे स्वच्छंद पणे खेळणारी.

रानफुलांच्या माळा डोई वर कानाच्या वर लेवून आनंदी राहणारी पोर अन पारो सांगायची कि चुली वर भाकरी थापायला पण परी चा हात मागे हटत नाही.

राम्या कातकरी कुटुंबाने बरोबरी परी ला हेरले, महादू अन पारो कडे रान परी कडे आपल्या राजू साठी मागणी घातली, राजू ! राम्या कातकऱ्याचा धाकटा पोर थोडासा शांत राहाणारा, तीन पोरी नंतर काही वर्षाने राजू झाला आणि राजू ची आय म्हणजे राम्याची बायको आजारी पडली होती बाळंतपणात पण पाड्यावर येणाऱ्या डागदर अन ग्रामसेवकाने, राम्याचा धावपळीत साथ दिली अन राजू च्या आय ला ग्रामीण रुग्णालयात भरती केली. राजू ला पाड्यावरील बायकांनी सांभाळले अगदी पारो नी पण काही काळ बघितले होते. भाताची पेज अन इतर त्याला दिले जात होते पण त्याच्या आयच्या अंगावरचे दूध पोराला मिळाले नाही बराच काळ अन मग तो थोडा मोठा झाला, आय घरी होऊन परत सर्व कर्ती सवरती झाली पण राजू अंगावरचे घेईनासा झाला.

राजू मग थोडा इतर पाड्यावरील मुलांसारखा खेळ व इतर गोष्टी मध्ये कमी रमत होता. बांबूचा पावा अन ढोलकी ह्या दोन्हीचा छंद राजू ला लागला. पाड्यातील भजने अन इतर कार्यक्रमात राजुचा पावा घुमत होता अन ढोलकी वर थाप पडत होती.

राम्या थोडा वयाने अन पाड्यावरील मानाने महादू पेक्षा मोठा होता. राम्याचा उंबरठा रानपरी ला सून करून घेणार म्हणून महादू अन पारो आनंदली होती, राजू थोडा शांत असला तरी त्याचा पावा अन ढोलकी रानपरीला पण आवडायची.

काही काळात रानपरीचे अन राजू चे लगीन झालं, डोरले बांधले, चांगलं जड मणी होता त्यात महादू अन पारोच्या कमाईचा ! पोरीचा हात राजुच्या हाती देऊन, राम्याचा अन महादूचा उंबरठा खुशीत होता.

रानपरी अन राजू च्या लगीन झाल्यावर नवरा बायको संबंधात राजू कमी पडू लागला. रानपरी बेभान व्हायची अन राजू चा पावा अन ढोलकी सारखा सूर अन ताल इथे जमत नव्हता आधी धाप लागायची मग ग्रामीण रुग्णालयात अन समाजसेवी डॉक्टरांच्या कॅम्प मध्ये राजू ला दाखवल्या वर हे निश्चित झाले कि राजू ची इच्छा आहे पण उर्मी कमी पडत होती. शरीर साथ देत नव्हते.

डागदर नंतर वैदूला पण बोलावले त्याने रानऔषधी दिली पण राजू ला ती झेपेनासे झाली. खूप उष्ण पडली मग परत सरकारी दवाखाना ! तिथल्या डॉक्टर लोकांचे खडे बोल ! राम्या, राम्याची बाय, महादू अन पारो सर्व उदास झाले.

एक दिवस तालुक्याच्या दवाखान्यातून एस टी तुन येताना गर्दीत, राम्या अन रानपरी असताना राजू अचानक कोसळला, सगळे संपले होते राम्या कातकरी खचून गेला राम्याची आय धाय मोकलून रडत होती. महादू अन पारो खिन्न झाले होते. रानपरी राजुच्या त्या थंड पडलेल्या शरीराकडे खिन्न होऊन शून्यात बघत होती.अंत्यसंस्कार झाले अन मणी तुटला, डोरले खाली पडले अन रानपरीची मान ओकी बोकी दिसायला लागली.पाड्यावर तसेच आजूबाजूच्या वस्तीवर चर्चा रंगू लागल्या, राजू लहानपणी अंगावर कमी प्यायला होता म्हणून तर.... कोणी म्हणे रानपरी भारी पडली त्याला .................

राम्या, महादू दोन्ही उंबरठे खिन्न होते, दोघांना जबाबदार मुले होती ती पावसाळ्यात डोंगर उताराच्या भागात भात शेती करणे, पळस, फाटा आणणे कधी गावठी मधाला अथवा वटवाघळाच्या तेलाला मागणी आली तर ते काढून आणणे तर कधी जवळच्या धाब्यावर, कंत्राटावर मोल मजुरी करू लागली.

रानपरी खिन्न बसून होती काही काळ मग तिच्या परत लग्नाचा विचार जरी राम्या अन महादुने केला तरी जणू ती आता समाजात शापित अप्सरा झाली होती ऐन विशीत !

हळू हळू रानपरीने पण विषय काढला अन मग पाड्यावरून पळस, फाटे, रान भाजी घेऊन जाण्याऱ्या बायका बरोबर ती पण कधी पहाटेच्या टिटवाळा प्लॅटफॉर्म वर भाजीच्या तर कधी दिवा - मुंब्र्याच्या फाटे बाजारात जाऊ लागली. कधी गुडीपाडवा दसरा दिवाळी साठी कडुनिंब तसेच तोरणाचा झाड पाला व पळस घेऊन जाऊन लागली. आज जवळ जवळ आठ ते दहा वर्षांनी एका धावत्या गाडीतून दिसली होती पण तिशीतही ती जणू विशीतली दिसत होती अन थोडे स्वकमाई चे तेजहि तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.खरोखर नियती क्रूर असते कधी कधी मग रानपरीची होते शापित अप्सरा !

रानपरीच्या आयुष्यात पण रंगाची उधळण होऊ दे ती पण परत ढोलकी अन पाव्याच्या तालावर नाचू बागडू दे हीच होळी च्या पूर्व संध्ये वर मनःपूर्वक शुभेच्छा !

तिच्या अन तिची हि गोष्ट वाचणाऱ्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचे रंग भरणारी रंगपंचमी यावी हीच नियती कडे प्रार्थना !

© रविंद्र गांगल(पोस्ट चा बहुतेक भाग मिळालेल्या माहिती वर तसेच बराचसा काल्पनिक आहे, एखाद्या व्यक्ती बद्दल समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप!) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Displayed at FB on 20th March 2019