Friday, 14 June 2019

२६ नोव्हेंबर २००८ ची रात्र !

२६ नोव्हेंबर २००८ ची रात्र !


२००८ नंतर दरवर्षी ह्या दिवसाचे आणि त्या वीर पोलीस अधिकाऱ्यांचे स्मरण केले जाते त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि दुसऱ्या दिवशी पासून मुंबई आणि मुंबईकर त्या धक्क्यातून विसरून परत एकदा आर्थिक राजधानीत आपल्या रोजी रोटी कडे जाऊ लागला याचे स्मरण होते.
पण ..................................................

मुंबईची जीवनदायिनी असलेली आमची रेल्वे तर त्या दहशतवादी हल्ल्या नंतर परत काही तासात सुरु करण्याचे धाडस आमच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवले ते अतुलनीय होते.

मला आठवते इव्हनिंग सिंगल करून मी साधारणतः रात्री ८ नंतर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस च्या आमच्या रनिंग रूम मध्ये आराम करायला जात होतो माझे जेवण होऊन मी थोडा वेळ ड्युटी वर असलेले माझे वरिष्ठ सहकारी श्री महेंद्र मंडल याचे जेवण होई पर्यंत थांबलो होतो. ते आधीच्या वाणिज्य विभागात हि माझे वरिष्ठ सहकारी होते. त्या नंतर मी रनिंग रूम मध्ये मोबाईल चार्जिंग ला लावून आवाज म्यूट करून झोपलो साधारणतः रात्री अकरा च्या नंतर उठलो, बेडवरुन उठताना आपल्या रात्रीच्या वर्किंग ला जायचे म्हणून मोबाईल वरील घडाळ्याकडे लक्ष जाताच माझ्या असे लक्षात आले कि माझ्या पत्नी सहित अनेक जणांचे मिस्ड कॉलस आहेत. मी सुरवातीला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही मी आमच्या रनिंग रूम मधील बेअरर / मदतनिसाला विचारले कि काही गडबड आहे का ? तो म्हणाला "साब नीचे फायरिंग हुवा बोलते हॆ ! अभी सिक्युरिटी /पोलीस एरिया सील किया है!

तेवढ्यात माझा मोबाईल फोन घरी लागला, माझ्या पत्नीने माझी ख्याली खुशाली विचारली आणि जे सांगितले ते ऐकून मी सर्द झालो, ती सांगत होती कि टीव्ही चॅनेल्स वर सांगत आहे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आहे आणि पहिली बातमी आहे आपल्या सि एस टी स्टेशनची ! तू काळजी घे ! मी हो म्हंटले आणि फोन ठेवला.
लगबगीने युनिफॉर्म आणि खाली धावलो, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल, गाडी रस्ता आणि रिझर्वेशन सेंटर यांच्या मध्ये असलेल्या मालवाहुतकीच्या भागातून आमच्या लॉबी कडे जाण्याच्या मार्गावर सर्वत्र विखुरलेले कपडे, रक्त, प्रवासी सामान आणि काही मृतदेह दिसत होते ..........................

अनेक ऍम्ब्युलन्स तसेच दक्षिण मुंबईतलं स्वयंसेवक संस्थांचे कार्यकर्ते धडाडीने जखमींना सेंट जॉर्जेस कडे नेत होते. मी आमच्या सीएसटी स्टेशनच्या पुण्याजवळून येणाऱ्या पार्सल पोर्टर मामांना बघितले ते पण प्रचंड घाईत होते नंतर कळले कि पार्सल च्या हातगाड्यावरुन पण जखमींना सेंट जॉर्जेस कडे नेले होते असे सांगतात.

सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या दिशेने ते मुंबई स्टेशन च्या मेनलाईन भागात शिरले तिथे मुख्य प्रतीक्षा हॉल मध्ये त्यांनी आपल्या एके -४७ अथवा तत्सम बंदुका मधून अंधाधुंध गोळीबार केला आणि त्यात टीसी ऑफिस जवळील स्टाफ च्या दिशेने म्हणजे आज सि एस एम टी मधील सिनियर स्टेशन मॅनेजर ऑफिस च्या भागात सर्व गोळीबाराचा रोख होता. त्या सर्व कोलाहला मुळे आणि हि घटना समजल्याने पुढे साधारणतः पश्चिम बाजूला असलेला उपनगरीय विभाग कडे ते अतिरेकी जाण्यापूर्वी, सबर्बन अनाउंसर श्री विष्णू झेंडे यांनी सिएसटी स्टेशन खाली करा ताबडतोब ह्या प्रकारच्या अनांउन्समेंट मुळे उपनगरी विभागात मनुष्य हानी तशी कमी झाली हे नंतर समजले असो

मी जसा उपनगरी विभागा कडे सरकू लागलो तेव्हा परिस्थितीची जाणीव नक्की होत गेली मला मेनलाईन विभागातून उपनगरीय विभागाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि मी मागे दक्षिणे कडे येऊन परत मुंबई लोहमार्ग पोलीस ठाणे म्हणजे मुंबई जि पी ओ च्या बाजूच्या दिशेला आलो तेथील एका मुंबई रेल्वे पोलिसाला जाणीव करून दिली कि मी बऱ्याच वेळा सध्या उपनगरीय लॉबी मध्ये शिफ्टस मध्ये ड्युटी व्यवस्थापन बघण्याच्या कामात मदत करतो तेव्हा मला आता उपनगरीय विभागातील लॉबीत जाणे आवश्यक आहे. तो म्हणाला कि साहेब, ह्या बाजूच्या गेट मधून अतिरेकी शिरून तुमच्या लॉबी परिसरावर प्लॅटफॉर्म डेड एन्ड बाजूने गोळीबार करून आणि जी एम ऑफिस च्या प्लॅटफॉर्म परिसरातून जाणाऱ्या भागात गोळीबार करून आता उत्तरेच्या म्हणजे मशीद स्टेशनच्या दिशेला फूट ओव्हर ब्रिज वरून गेलेत म्हणून पूर्ण भाग सील केला आहे.

मी विचार केला जर हा प्रकार रात्री एक डिड तास सुरु होता आणि अजूनही ते मस्जिद बाजूच्या म्हणजे उत्तरेच्या बाजूने गेले तर बाहेर गाड्यांची किती रांगा लागल्या असतील आणि प्रवासी बहुतेक वेळा निघून जातात पण मोटरमन / गार्ड यांना गाडी सोडता येत नाही, जेवणाच्या वेळा टळल्या असतील डबे लॉबीत असतील एक ना दोन ....................................
मी मनाचा हिय्या करून पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आमच्या लॉबीत शिरलो, ज्यांना स्टेशन परिसराची ओळख आहे त्यांना लक्षात येईल कि जि पी ओ साईड च्या गेट पासून आमच्या सबर्बन लॉबीत शिरे पर्यंत पण त्यांनी एक हत्यारबंद पोलिसांच्या बरोबर मला जाण्यास सांगितले होते.

मी लॉबीत आलो तर श्री महेंद्र मंडलजी आणि इतर काही आमचे रेल्वे सहकारी लॉबीत होते. लॉबीच्या ग्रीलवर तसेच स्टेशन मास्तर सबर्बन कार्यालयावर झालेल्या गोळीबार खुणा आम्ही बघितल्या. लॉबीत नंतर श्री संजय पांडे ह्यांची भेट झाली, गोळीबाराचा रोख उपनगरीय विभागात तर त्यांच्याच दिशेने होता पण काही कामकाजास्तव ते लॉबीत आतल्या बाजूला होते म्हणून वाचले. लोंबीतील आमचे खिडक्यांच्या जवळ काम करणारे सहकाऱ्यांना तर अगदी शत्रू पेक्षा कडून फायरिंग येताना सैनिक बंकर मध्ये चपळाईने खाली बसतात तसेच करावे लागले होते.

असे म्हणतात जि एम ऑफिस मार्गिकेच्या भागातून अजमल कसाब आणि त्याच्या दोन साथीदारांना प्रतिकार झाला म्हणून ते उपनगरीय विभागाच्या उत्तर बाजूला असलेल्या भागातून ब्रिज वरून कामा हॉस्पिटल कडे जावे लागले. ( थोडक्यात जि एम ऑफिस आणि महापालिका मुख्यालय वाचले )
दहशतवाद्याकडे सॅटेलाईट फोन आणि ऑनलाईन मॅपिंग होते म्हणतात नंतर पुढे एक दीड दिवसाचा थरार घरून टीव्ही वर लाईव्ह कव्हरेज बघितले तेव्हा लक्षात आले कि ते जर उपनगरीय विभागातून पश्चिमेकडे जर गेले असते तर महापालिका, टाइम्स बिल्डिंग हे टार्गेट झाले असते. असो

लॉबीत पूर्ण सन्नाटा होता रात्री साधारणतः नऊ साडे नऊ नंतर काहीच झाले नव्हते, अनेक मोटरमनस आणि गार्डस यांनी कायम ह्या वेळेस गजबजलेली लॉबी शांत होती कुठून निरोप फोन येत होते आणि विचारणा होत होती कि गाड्या कुठून सुरु होणार. स्टेशन परिसरातील आमचे तत्कालीन वरिष्ठ स्टेशन मॅनेजर श्री ए के तिवारी साहेब आणि एक वाणिज्य विभागातील आधिकारीं आले होते. आमच्या गार्ड साईड ला श्री मंडल साहेब यांनी अजून न आलेल्या गाडीवरील आणि अजून जाऊ न शकणाऱ्या गाडी वरील गार्डस ची यादी करण्याचे काम सुरु केले होते. वरिष्ठ स्टेशन मॅनेजर साहेबानी मला श्री मंडल साहेबाना मदत करण्याचे सुचवले तेच काम मोटरमन साईड ला सुरु होते मग आमच्या लक्षात आले कि काही मोटरमनस आणि गार्डस यांचा निश्चित ठावठिकाणा लागत नाही. आम्हाला असे कळले कि गाड्या सुटण्याच्या बाजूला गेलेले एक दोन मोटरमन अजून गेले काही तास कॅबस मध्ये अडकून आहेत मग वरिष्ठ स्टेशन मॅनेजर आणि आम्ही एक दोन जणांनी पोलीस बंदोबस्तात मस्जिद साईड च्या कॅब कडे जाऊन चेक केले तर तिथे कोणी नव्हते.
लॉबी च्या बाहेरील उप स्थानक प्रबंधक श्री संजय पांडे आणि इतर सहकाऱ्यांच्या माहितीवरून फोर्ट, महापालिका, आजाद मैदान आणि बोरा बाजार साईडला अडकून पडलेल्या अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शोध आणि सुटके साठी पोलीस मदत आणि यंत्रणा याची मदत घेणे सुरु झाले

शशिकांत वाळुंज आणि नामदेव डी हे दोघे काही काळाने लॉबीत आले तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला मग सगळ्यांच्या याद्या करून पोलीस / सिक्युरिटी क्लीअरन्स आदी घेऊन ट्राफिक सुरु करायच्या तयारीत लोकांच्या जेवणाचा एक प्रश्न उभा राहिला, कारण झोप अथवा आराम आवश्यक होता पण आमचे बहादूर रेल्वे गार्डस आणि मोटोरमन परत मध्यरात्री नंतर गाड्या चालवायला सज्ज झाले होते अर्थात पोटात काही जाणे आवश्यक होते, डबे विखुरले होते कँटीन मधील जेवण खराब झाले होते स्टाफ नव्हता मग वाणिज्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी मेंन लाईन मधील कँटीन मध्ये रात्री एक दीड पुढे खूप साऱ्या वडा पाव ची व्यवस्था केली होती.

पुढे अंदाजे दोन तीन नंतर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून पहिल्या गाड्या सुरु झाल्या मग येणारे गार्डस आणि मोटोरमन यांची काळजी घेऊन ते चार पाच तास अनेक सिग्नलस वर थांबून रिकाम्या गाड्या घेऊन येऊन आणि माहिती अभावी थकले होते त्यांना परत एकदा तयार करवून पुन्हा परत १५-२० मिनिटात चहा वडापाव देऊन परत गाडीवर पाठवण्याचे काम आम्ही सारे निगुतीने करत होतो ते अगदी २७ नोव्हेंबरच्या सकाळी जवळ जवळ नऊ वाजे पर्यंत ..................
आणि त्या माझ्या बहादूर गार्डस / मोटोरमन्स तसेच मुंबई स्थानकाच्या हिम्मतवाल्या वाल्या सर्व कर्मचाऱ्यांना सलाम त्यांनी मुंबई परत एकदा सर्वांत आधी गजबलेली ठेवण्याचे महत्कार्य केले
ती २६ नोव्हेंबर २००८ ची रात्र मी विसरणे शक्यच नाही

पुन्हा एकदा सलाम त्या जाबांज हुतात्म्यांना, वीरांना !
आणि
माझ्या सर्व रेल्वे कर्मचारी सहकाऱयांना, त्यांनी सडेतोड उत्तर देत पुन्हा एकदा मुंबई आणि रेल्वे कुठल्याही दबावाला भीक घालणार नाही हे आपल्या कर्तव्यनिष्ठेने सिद्ध केले त्यांना सलाम !


( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, माझ्या सर्व सहकारी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचे कौतुक आज होणे आवश्यक आहे म्हणून हा खटाटोप) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Displayed on 27th December 2017 at FB

No comments:

Post a Comment